वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील पीक लागवडीबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात रब्बी पेरणी रखडली असून, जमिनीत ओल नसल्याचा फटका पेरणीला बसला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २४ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज आहे.

वाशीम जिल्ह्यात या वर्षी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. असे असतानाही पेरण्यांबाबत मात्र शेतकरी धाडस करायला तयार नसल्याचे स्पष्ट दिसून येते. वाशीम जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी सुमारे ९३ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. या नियोजित क्षेत्रापैकी आतापर्यंत २२ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. यात हरभऱ्याची सर्वाधिक १८ हजार हेक्‍टरवर लागवड झालेली असून, उर्वरित चार हजार हेक्‍टर क्षेत्रावर गहू आणि इतर पिकांची लागवड झाली आहे.

रब्बीसाठी जिल्ह्यात या हंगामात हरभऱ्यासाठी सुमारे ६२ हजार ४०० हेक्‍टर क्षेत्र नियोजित आहे. सोबतच गहू २८ हजार ४९७,  रब्बी ज्वारी १३९७ व इतर पिके मिळून हे लागवड क्षेत्र ९३ हजार हेक्‍टरपर्यंत पोचेल असा अंदाज होता. जिल्ह्यात झालेला पाऊस, प्रकल्पांमधील पाणी याबाबी समोर ठेवून नियोजन करण्यात आले. आता पेरणीची वेळ आली असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच परतीच्या पावसाने पूर्णतः पाठ फिरविल्याने ओल कमी झाली. त्यानंतरही शेतकरी संरक्षित सिंचन करून पेरणीच्या विचारात असताना वीजपुरवठ्याचा प्रश्‍न आडकाठी आणत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतीसाठी तासन्‌ तास वीज बंद राहते. वीज रोहित्र जळणे, कमी दाबाने पुरवठा होणे या समस्या आहेत. सातत्याने कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंप जळण्याचे प्रकारही वाढत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. अशा अडचणींमुळे रब्बी लागवड अत्यंत संथगतीने केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com