शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेती करावी : गुलाबराव पाटील

परभणी येथील मेळाव्यात मार्गदर्शन करताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
परभणी येथील मेळाव्यात मार्गदर्शन करताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

परभणी : सरकार तसेच कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, मानसिकतेत बदल करावा. नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करत नव्या उमेदीने शेती करावी, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रविवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्यातर्फे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित रब्बी पीक शेतकरी मेळाव्याचे उद्‍घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. खासदार संजय जाधव, आमदार डाॅ. राहुल पाटील, शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक एम. एल. चपळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बी. डी. कच्छवे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डाॅ. पी. आर. देशमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, की मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत विहिरी फेरभरण केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्यासाठी प्रभावी अमंलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी गटाने सामूहिक शेतीसाठी पुढे यावे. शेती व्यवसाय सट्ट्याचा झाला आहे. हमीभाव मिळाला तर शेतकरी टिकून राहतील. परंतु त्यासाठी सर्व शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, की कपाशीच्या नांदेड ४४ वाणाचे बी.टी.बियाणाचे उत्पादन अकोला आणि कर्नाटकामध्ये घेण्यात येत आहे. पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना नांदेड ४४ कपाशीच्या बी.टी.बियाणाचे ५० हजार पाकिटे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

खासदार जाधव म्हणाले, की परभणी जिल्ह्यात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मोठी क्षमता आहे. त्यासाठी आपण केंद्र तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे.  यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन पाटील यांनी केले.

कृषी विभागातर्फे यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थींना ट्रॅक्टर तसेच अवजारे वाटप करण्यात आले. प्रा. वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. देशमुख यांनी आभार मानले.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी आपण नेहमी अॅग्रोवन वाचत असतो. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दररोज ताजी माहिती मिळत असते, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com