अकोला ः खरिपातील सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आलेली असून दुसरीकडे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांनी वेग घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात सुमारे २९७२२ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलवडे यांनी दिली. जिल्ह्याचे सरासरी रब्बी लागवड क्षेत्र ११५४६६ हेक्टर असून आजवर २५ टक्के क्षेत्र लागवडी खाली आहे.
यंदा परतीचा पाऊस दमदार झाला असून रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता आहे. कृषी विभागाने यंदाची पोषक स्थिती पाहता सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवडीचा लक्ष्यांक ठेवला आहे. या हंगामात हरभऱ्याची लागवड एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नेण्याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.
जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ७०६०० हेक्टर एवढे आहे. ते यावेळी एक लाख १५ हजार हेक्टरपर्यंत पोचू शकते. सध्या गहू, हरभऱ्याची पेरणी वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सोयाबीन, मूग, उडीद ही पिके काढून खाली असलेल्या शेतात शेतकरी हरभऱ्याची लागवड करतात. जिल्ह्यात खारपाण पट्ट्यात हरभऱ्याची उत्पादकता चांगली असल्याने त्याच भागात लागवड क्षेत्र सर्वाधिक राहते.
रब्बीकडून अपेक्षा खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या प्रमुख पिकांचे उत्पादन जेमतेम राहिल्याने शेतकऱ्यांना यंदाही मोठा फटका बसलेला आहे. मुगाचे संपूर्ण पीकच गेले होते. सध्या शेतात उभ्या असलेल्या कापूस पिकाची स्थिती फारशी चांगली नाही. बोंड अळी व बोंड सडीमुळे कापूस उत्पादक त्रस्त आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बीवर अधिक आहेत. रब्बी साधण्यासाठी शेतकरी दिवाळीच्या पर्वातही शेतशिवारात राबत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.