वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

वादळी पावसाने गहू आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. परंतु धोंडराई मंडळात पीकविम्यामध्ये बसत नाही. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. माझा दोन एकरांतील गहू वादळात पूर्णत: झोपला. येत्या पंधरवड्यात तो काढणीला आला असता. शेतातील दोन आंब्याची झाडेही या वादळात पडली आहेत. - अमोल गिते, शेतकरी, धोंडराई, जि. बीड
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

पुणे ः अकोला जिल्ह्यातील देवरी (ता. अकोट), मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई आणि बीड जिल्ह्यांतील धोंडराई, गंगावाडी व तळणेवाडी (ता. गेवराई) परिसरांत बुधवारी (ता. २०) सायंकाळी गारपिटीसह, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आज (ता. २२) पासून राज्यात कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  विदर्भातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. यामुळे बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहानंतर विदर्भातील अकोला जिल्ह्यातील देवरी, कुटसा (ता. अकोट) येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. तसेच अमरावती, बुडाढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत हलका पाऊस पडला. तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे वादळी वाऱ्यामुळे गहू, केळी या पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात रात्रीच्या दहाच्या सुमारास वीस मिनिटे वादळी पाऊस झाला. या भागात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. रेलगाव, पारध, वरूड, देहड, कोसगाव, मोहळाई, सावंगी अवघडराव, जळगाव सपकाळ या ठिकाणी हलक्या पावसाने हजरी लावली.  राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. थंडीच्या कडाका कमी झाल्यानंतर उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या वर गेले आहे. उन्हाची वाढलेली ताप आणि ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. येत्या शनिवारपर्यंत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी वाढणार असल्याने उन्हाचा चटका कायम राहणार आहे. यासह रात्रीच्या किमान तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. गुरुवारी (ता. २१) दुपारीनंतर दोन नंतर बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, नागपूर, चंद्रपूरसह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या भागांत अंशतः ढगाळ हवामान होते.

या ठिकाणी झाला पाऊस... जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, पारध, वरूड, देहड, कोसगाव, मोहळाई, सावंगी अवघडराव, जळगाव सपकाळ.  बीड जिल्ह्यातील धोंडराई, गंगावाडी व तळणेवाडी आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारासह या तालुक्यातील बेलखेड, राणेगाव, पाथर्डी, घोडेगाव अकोट तालुक्यात मुंडगाव, देवरी या गावात पाऊस झाला.  पिकांचे नुकसान पिंपळगाव रेणुकाई परिसरात गारपिटीने जमीन पांढरीशुभ्र दिसत होती. या अवकाळी पावसाने आंब्याना आलेला बहर जमीनदोस्त झाला. शेतात सोंगून ठेवलेला हरभरा ओला झाला. त्याचे घाटे घळून पडले. तर वादळामुळे गव्हाचे पीक आडवे झाले. वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे पडली. तर गारपिटीने घडांना मार बसला. वादळ, पाऊस आणि गारपिटीने आंब्याला आलेला मोहोर गळून पडला. गुरुवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.५ (१७.५), नगर ३८.४, जळगाव ३५.२ (१६.६), कोल्हापूर ३५.५ (२१.१), महाबळेश्‍वर ३१.९ (१८.३), मालेगाव ३७.४ (१९.४), नाशिक ३६.२ (१५.७), सांगली ३५.९ (१९.७), सातारा ३६.१ (२०.२), सोलापूर ३७.१ (२२.६), सांताक्रूझ ३१.४ (२०.०), अलिबाग ३१.० (२०.६), रत्नागिरी ३१.२ (२२.३), डहाणू ३०.५ (१८.९),  औरंगाबाद ३५.५ (२०.२), बीड ३९.० (२०.४), परभणी ३७.६ (२२.०), नांदेड ३७.५ (२२.०), उस्मानाबाद ३४.१, अकोला ३६.७ (२२.५), अमरावती ३६.० (२०.२), बुलडाणा ३५.२ (२०.२),  चंद्रपूर ३६.२ (२०.०), गोंदिया ३२.४ (१९.५), नागपूर ३५.२ (१९.४), वर्धा ३४.८ (२१.९), यवतमाळ ३६.५ (२२.४).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com