राज्यात बुधवारपर्यंत पावसाची शक्यता

राज्यात बुधवारपर्यंत पावसाची शक्यता
राज्यात बुधवारपर्यंत पावसाची शक्यता

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजा, गारांसह पावसाने दणका दिला. तीन ते चार दिवसांपासून विविध भागांत सुरू असलेल्या पावसाने रब्बी पिके, फळबागा, भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने बुधवारपर्यंत (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  रविवारी (ता.८) सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. जावळी तालुक्‍यात वीज पडून केळघर येथील गणपत नारकर यांचा, तर सेनगाव येथील आदिनाथ मोरे या दोघांचा मृत्यू झाला. पावसाने रब्बी पिके आंब्याचे नुकसान झाले. सातारा, वाई, महाबळेश्‍वर, पाटण, जावली तालुक्‍यातही पूर्वमोसमीच्या सरी पडल्या. खटाव-माण या दुष्काळी तालुक्‍यांना चांगलेच झोडपून काढले. पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, हवेली तालुक्याच्या काही भागांत रविवारी विजा, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. शिरूर, हवेली परिसरात तुरळक गाराही पडल्या. या पावसाने कांदा आणि आंबा पिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तडाखा दिला. रविवारी राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जतला पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.  मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रविवारी सायंकाळी व रात्री उशिरा विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मळणी सुरू असलेल्या पिकांचे नुकसान झाले. जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर, जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, तर इतरत्र ढगाळ वातावरण होते. अंजनडोह (ता. धारूर) येथे वीज कोसळून गाय ठार झाली. धारूर व गेवराई तालुक्‍यात पिकांचे नुकसान झाले. आलूर परिसरात ज्वारीसह इतर पिकांना फटका बसला. उमरगा तालुक्‍यात आलूर येथे गारपीट झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरासह तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांमध्ये झालेल्या पाऊस, गारपिटीने उन्हाळी कांदे, कांदा बियाणे, गहू पिकांचे नुकसान झाले. मनमाड शहर परिसरात पावसामुळे काढणीवर आलेला कांदा व गहू पिकांना फटका बसला.  पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र ते अाग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशावर हवेच्या चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत अाहे. बुधवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता कायम आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात उन सावल्यांचा खेळ सुरू आहे. ढगांच्या आच्छादनामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाल्याने मराठवाडा, विदर्भात तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंत जळगाव येथे उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  सोमवारी (ता.९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८, जळगाव ४०.२, कोल्हापूर ३५.३, महाबळेश्वर ३२.३, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.०, सांगली ३६.०, सातारा ३६.४, सोलापूर ३८.३, मुंबई ३३.८, रत्नागिरी ३५.४, डहाणू ३४.२, आैरंगाबाद ३६.७, परभणी ३८.९, नांदेड ३७.५, अकोला ३९.७, अमरावती ३६.४, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ३६.०, गोंदिया ३७.५, नागपूर ३४.८, वर्धा ३७.८, यवतमाळ ३७.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com