कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज 

येत्या तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज 
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज 

पुणे : अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान होत आहे. यामुळे गारठा काहीसा कमी झाला आहे. येत्या तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

ऑक्टोबरमध्ये परतीचा मॉन्सून गेल्यानंतर दक्षिणेकडील समुद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीपासून चक्रीवादळांची साखळी तयार झाली. एका पाठोपाठ आलेल्या ‘गती’, ‘निवार’ आणि ‘बुरेवी’ चक्रीवादळांनंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. तर अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्‍चिमी चक्रावातमुळे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली राज्यांतही पाऊस पडत आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. जमिनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागांत हवेत गारठा वाढला आहे. यातच उत्तरेकडून वाहणारे थंड आणि समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांचा मिलाप होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. ११) सकाळपासूनच कोकणासह राज्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडल्याची स्थिती होती. सोमवारपर्यंत (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही पावसाची शक्यता असून, मंगळवारपासून (ता. १५) विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामान आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

ढगाळ हवामानामुळे उत्तरेकडील थंड वार्यांच्या प्रवाहाला अडथळा तयार झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांतून थंडी गायब झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमी राहणार आहे. शनिवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत चंद्रपूर येथे १४.६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.  शनिवारी (ता. १२) सकाळपर्यत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) २३.८ (५), अलिबाग २३.५ (५), ठाणे २२, रत्नागिरी २४ (३), डहाणू २२ (३), पुणे १७.९ (७), जळगाव २० (८), कोल्हापूर १९.८ (४), महाबळेश्‍वर १५.९ (२), मालेगाव १९ (८), नाशिक १९ (८), निफाड १७.४., सांगली १९.४ (१), सातारा १८.७ (५), सोलापूर १८.१ (२), औरंगाबाद १९.४ (७), बीड १८.३ (५), परभणी १७.८ (४), परभणी कृषी विद्यापीठ १४.८, नांदेड १६.५ (४), उस्मानाबाद १९.६ (२), अकोला २०.१ (७), अमरावती २०.१ (५), बुलडाणा १८.२ (४), चंद्रपूर १४.६ (१), गोंदिया १७ (५), नागपूर १८.८ (६), वर्धा १८.८ (५), यवतमाळ १८.३ (४). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com