राज्यात सर्वदूर पाऊस

राज्यात सर्वदूर पाऊस
राज्यात सर्वदूर पाऊस

पुणे ः विदर्भ आणि मराठवाड्यात ओढ दिलेल्या पावसाने हलक्या ते जोरदार स्वरूपात हजेरी लावून दिलासा दिला. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लोणावळा (जि. पुणे) येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर, विदर्भातील मुलचेरा (जि. गडचिरोली) येथे २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.   रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेतील सुमारे ३५ हून अधिक दुकाने रात्रभर पाण्याखाली गेली. राजापुरातील जवाहर चौकात पाणी भरले असून, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शिवाजी पथ, वरची पेठ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेतही पाणी शिरले. पावसाचा जोर कायम असून समुद्र खवळलेला होता. साखरप्यातील काजळी, संगमेश्‍वरातील सोनवी, शास्त्री, असावी, सप्तलिंगी, बावनदी, गडनदी दुथड्या भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शुक, शांती, कुसुर आणि अरुणा या चारही नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे खारेपाटण परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खारेपाटण शहराला पुराचा धोका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. दिवसभरच्या पावसाने विशेष करून पश्‍चिम भागाचे जनजीवन विस्कळित करून टाकले. पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे, ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने विविध मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान राधानगरी धरण मंगळवार सकाळपर्यंत ९५ टक्के भरले आहे. विविध नद्यांवरील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाहतूक बंद केली आहे. बाजार भोगाव व पोहाळेतर्फे बोरगाव येथे अंदाजे तीन फूट पाणी रस्त्यावर आले आहे.   सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुळसधार, तर जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, जत, तासगाव तालुक्‍यातदेखील पावसाने हजेरी लावली. आरळा-भाटवाडी येथील फरशीवजा पूल सलग तीन दिवस पडत असणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेला आहे. पावसामुळे वारणा, कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला, चासकमान, वीर, आंध्र, वडीवळे, येडगाव आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने इरतही धरणे भरण्याच्या मार्गावर असून, लवकर पाणी सोडावे लागणार आहे. मुळा, मुठा, कुकडी, इंद्रायणीसह उपनद्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे भीमेला पूर आला असून, अचल पातळीत गेलेले उजनी धरण उपयुक्त पाणीसाठ्यात आले आहे.  जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नद्यांच्या उगमस्थानाकडे मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील खिरवड-नेहता, ऐनपूर-निंबोल, निंभोरासिम-विटवा यादरम्यानची वाहतूक खंडित झाली असून, या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, अमळनेर या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तापी नदीवरील मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले. नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या काही दिवासांपासून पाऊस टिकून आहे. त्यामुळे मुळा व भंडारदरा धरणात पाण्याची आवक चांगली होत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्‍चंद्रगड ते कोतूळ परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, भीमा आणि गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. या नद्यांच्या काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर तालुक्यात काही ठिकाणी अधिक जोर राहिला. मंगळवारी (ता. ३०) दुपारपर्यंत रिमझिम सुरू होती. दरम्यान, अजून एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या अद्याप प्रवाहित झाले नसल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात ढगांची गर्दी, दोन दिवसांपासून जवळपास सर्वदूर सूर्यदर्शन नाहीच. परंतू ढगांच्या गर्दीच्या तुलनेत पाऊस मात्र अगदीच तुरळक होत असल्याची स्थिती मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.  मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : कर्जत १८०, जव्हार १७०, लांजा, विक्रमगड प्रत्येकी १६०, माथेरान १५०, भिरा १४०, भिवंडी, खालापूर, कुडाळ, पोलादपूर, वाडा प्रत्येकी १३०, चिपळूण दोडामार्ग, खेड, मोखेडा, पेण, राजापूर प्रत्येकी १२०, कणकवली, मंडणगड, सुधागड पाली, उल्हासनगर, वैभववाडी प्रत्येकी ११०, बेलापूर, संगमेश्वर, सावंतवाडी प्रत्येकी १००, अंबरनाथ, दापोली, कल्याण, महाड, मुरबाड प्रत्येकी ९०, गुहागर, माणगाव, रोहा, तलासरी, ठाणे प्रत्येकी ८०, मुलदे, पनवेल प्रत्येकी ७०, डहाणू, शहापूर प्रत्येकी ६०, पालघर, पेडणे, रत्नागिरी प्रत्येकी ५०.  मध्य महाराष्ट्र : लोणावळा (कृषी) २८०, गगनबावडा, महाबळेश्वर प्रत्येकी २३०, चंदगड, सुरगाणा प्रत्येकी १५०, राधानगरी १४०, त्र्यंबकेश्वर, वेल्हे प्रत्येकी १३०, हर्सूल, इगतपुरी, पौड प्रत्येकी १२०, ओझरखेडा, पाटण, पेठ, वडगाव मावळ प्रत्येकी ११०, भोर, गारगोटी, कोल्हापूर प्रत्येकी ९०, जावळी मेढा, नवापूर, पन्हाळा, शाहूवाडी प्रत्येकी ८०, गडहिंग्लज, खेड, सातारा, वाई प्रत्येकी ७०, कागल, कराड प्रत्येकी ६०, कडेगाव, रावेर, शिराळा, विटा प्रत्येकी ५०.  मराठवाडा : किनवट ८०, हिमायतनगर, माहूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कळमनुरी, उमारी, देगलूर, जळकोट, मुदखेड, मुखेड, नायगाव खैरगाव, नांदेड, उदगीर प्रत्येकी २०. विदर्भ : मुलचेरा २७०, अहीरी १८०, सिंदेवाही १४०, चंद्रपूर १३०, चामोर्शी, मुल प्रत्येकी १२०, आरमोरी, धानोरा, एटापल्ली, पवनी, सावळी प्रत्येकी ११०, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, गडचिरोली, गोंडपिंपरी प्रत्येकी १००, कोर्पणा, वरोरा प्रत्येकी ९०, अजुर्नीमोरगाव, भद्रावती, भिवापूर, देसाईगंज, नागभीड, पांढरकवडा, राजुरा, धारणी, जिवती, लाखंदूर, सिरोंचा, आर्णी, चिमूर, कुरखेडा, मारेगाव, झरी झामणी, चांदूरबाजार, चिखलदरा, घाटंजी, पोम्बुर्णा, सडकअर्जुनी, वणी, हिंगणघाट, राळेगाव, समुद्रपूर, यवतमाळ प्रत्येकी ४०, आर्वी, आष्टी, देवरी, डिग्रस, मौदा, मोर्शी, उमरखेड, उमरेड, वरुड प्रत्येकी ३०. घाटमाथा : वळवण २६०, लोणावळा (ऑफीस) २५०, अम्बोणे, ताम्हिणी, शिरगाव, कोयना (पोफळी) प्रत्येकी २३०, कोयना (नवजा) २००, दावडी, डुंगरवाडी, खंद प्रत्येकी १८०, खोपोली, वाणगाव प्रत्येकी १७०, भिवपुरी १५०, शिरोटा, ठाकूरवाडी प्रत्येकी १३०.

पाऊस, पुराचा फटका

  • रत्नागिरीत चार, पाच दिवसांपासून भातशेती पाण्याखाली 
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणमधील १० एकर भातशेती पाण्याखाली
  • सांगली जिल्ह्यात सोनवडे, मणदूर, आरळा, काळोखेवाडी, खोतवाडी, मिरुखेवाडीत बांध फुटीमुळे नुकसान 
  • कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे वेदगंगा, दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून भात, ऊस, भुईमूग पिकात शिरले
  • जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे विटवा, निंबोल, ऐनपूर, अजनाड, नेहेते, खिरवड, निंभोरासीम आदी गावांत तापी नदीकाठचे केळी पीक पाण्याखाली. 
  • वऱ्हाडात रिमझिम पाऊ. सोयाबीन पीक ठिकठिकाणी पिवळे पडत असल्याने शेतकरी चिंतेत
  • कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात मुसळधारेचा अंदाज मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र, तसेच मॉन्सूनचा आस पोषक स्थितीत असल्याने पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. ३१) राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वतविली आहे. अनेक नद्यांना पूर

  • रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी
  • भीमा आणि उपनद्यांमुळे उजनी उपयुक्त पातळीत 
  • गोदावरीला पूर आल्याने जायकवाडीत पाणीसाठा वाढला
  • सांगलीत वारणा, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ
  • मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस
  • हतनूरचे ४१ दरवाजे उघडले; तापीकाठी अतिदक्षतेचा इशारा  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com