पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु 

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उसंत घेतली आहे.
kop rain
kop rain

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी भागातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विस्कळित झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिक घरांबाहेर पडत असून उद्ध्वस्त झालेल्या घर आणि शेतीच्या कामांमध्ये गुंतले आहेत.  

गेल्या पंधरा दिवसांपासून कोकणात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेती पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. सध्या या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, कोकणात अजूनही पंचनाम्यांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करू लागले आहेत. राज्यात मंगळवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माथेरान, ठाण्यातील शहापूर येथे अवघा ४० मिलिमीटर पाऊस पडला. पालघरमधील जव्हार येथे ३१, रायगडमधील  माणगाव ३७, म्हसळा ३८, पोलादपूर ३१, रोहा ३२, रत्नागिरीमधील मंडणगड ३० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. 

मध्य महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव चांगलाच कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू असली तरी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या दुथडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८५.२ मिलिमीटर पाऊस पडला. कोल्हापूरमधील आजरा ३४, गगनबावडा ३३, राधानगरी ५८, नाशिकमधील हर्सूल ४१.६, इगतपुरी ५२, ओझरखेडा ३५.२, पेठ ४२.२, सुरगाणा ६५.३, त्र्यंबकेश्वर ६६, पुण्यातील लोणावळा कृषी ४०.२, पौड ३३, वेल्हे ४५ मिलिमीटर पाऊस  पडला. 

मराठवाडा व विदर्भातही पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी ऊन पडत आहे. काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे. तर नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागातील शेताशेतातील पाणी पातळी ओसरली आहे. त्यामुळे शेतीकामांना पुन्हा सुरूवात होऊ लागली आहे. 

राज्यात मंगळवारी (ता.२७) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये :  कोयना ४६, धोम बलकवडी ५१, धोम १०, कण्हेर ८, डिंभे २८, पानशेत ३९, वरसगाव ३८, खडकवासला १२, पवना २३, आंध्रा २२, निरा देवघर ४०, भाटघर १७, वारणा २७, दूधगंगा २४, राधानरी ८४, दारणा ३०, गंगापूर ३०, भंडारदरा ९७, इरई १५, भातसा ३२, सुर्याधामणी ४०, वैतरणा ५७.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com