पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम 

कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
kolhapur rain
kolhapur rain

पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. शनिवारी (ता.२४) राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. काही भागांतील पूरस्थिती आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे वित्तहानी व जीवितहानी झालेले नुकसान समोर येऊ लागले आहे. प्रशासनाकडून पाहणी केली जात असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे. 

गेल्या आठवड्यापासून दक्षिण कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडला. पूर्व विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून आले. उत्तर कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडलेल्या पालघर, ठाणे, नाशिक, नगर, पुणे, जळगाव, धुळे जिल्ह्यांच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांत पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. 

कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला. पालघर, नाशिक, नगर, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आठवड्यातील सरासरीच्या तुलनेत उणे ७४ टक्के म्हणजेच अवघा २६ टक्के, भंडारा जिल्ह्यात उणे ६२ टक्के म्हणजेच ३८ टक्के, तर नागपूरमध्ये उणे ६० टक्के म्हणजे अवघा ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.  पूरपरिस्थिती कायम  कोकणातील डोलवहालमधील कुंडलिका, नागोठणेमधील अंबा, लोहणामधील पाताळगंगा, कर्जतमधील उल्हास, पनवेलमधील गाढी, मालवणमधील सूर्या (वैतरणा खोरे) खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वशिष्टी नद्यांना अजूनही पूर कायम आहे. महाड शहरालगत असलेल्या सावित्री नदीची धोकादायक पातळी अजूनही कायम आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा, सांगलीतील कृष्णा या नद्यांची पूरपरिस्थिती अजूनही कायम आहे. पुणे जिल्ह्यातील मुठा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.  पिकांच्या नुकसानीत वाढ  कोकणात शेकडो हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी फळबांगाचेही नुकसान झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत प्रामुख्याने ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांना फटका बसला. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, हिंगोली भागांत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले. विदर्भातील अकोला, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागांत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आणि धान पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला  कोयना ५२५५९, धोम १००४२, कण्हेर १०१३५, वारणावती १९७५०, कासारी १२९८, धोमबलकडवी ३४५४, उरमोडी ५४३४, तारळी ९८६३, खडकवासला १८,४९९, वीर २२३०५, कळमोडी ३२८४, आंध्रा ३३८०, वडीवळे ६२९४, वडज ५०५, गोसी खुर्द २६७९, हतनूर २४२१.  शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये :  तारळी ३५९, महाबळेश्‍वर २८७, वाराणावती २८५, धोमबलकवडी २४३, नीरा देवघर २५५, तुळशी २२२, नवजा २०७, धोम १७३, कण्हेर १५३, दूधगंगा १५९, पाटगाव १४५, ऊरमोडी १८२, टेमघर १९०, वरसगाव १८८, पानशेत १९३, खडकवासला ५८, पवना १२०, मुळशी २०१, कळमोडी १२४, वडीवळे १८७, गुंजवणी १७३, कासारी ८९, कोयना ८२, भामा आसखेड ८१, आंध्रा ९६, कासारसाई ७०, भाटघर ९२, वीर २५, नाझरे १६, पिंपळगावे जोगे ३८, चासकमान ३४, माणिकडोह २३, डिंभे ३२.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com