कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप

कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप

कोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहानंतर थांबलेल्या पावसाने बुधवारी (ता. १८) दुपारपासून पुन्हा जिल्ह्यात सुरवात केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागांत पावसाची रिपरिप सुरू राहिली. धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. दुसरीकडे सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांसाठी सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ९३.९९ मि.मी इतका पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सरासरी ७ मि.मी पावसाची नोंद झाली. कोयनेतून ११४८०, तर अलमट्टीमधून ३४३२४ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी नऊ वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी १७ फूट होती. जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, व शिरोळ हे ७ बंधारे, भोगावती नदीवरील खडक कोगे बंधारा, दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा पाण्याखाली आहे. नजीकच्या अलमट्टी धरणात १२३.०८ टीएमसी, तर कोयना धरणात १०४.६१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या सर्वच नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे. नद्यांची पाण्याची पातळी सामान्य झाली आहे.

हवामान खात्याने पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवारी दुपारनंतर पाऊस सुरू झाला. गुरुवारी दुपारपर्यंत अपवाद वगळता केवळ ढगाळ हवामान होते. यामुळे तातडीने पुराचा धोका नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यांचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी, दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यांच्या पूर्व भागात चांगला पाऊस पडत आहे. 

दरम्यान, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भातशेती पक्व होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास या शेतीचे नुकसान होईल. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि समुद्रात वादळी वारे वाहण्याच्या शक्यतेमुळे मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा सावधनतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com