सांगली ः व्यापाऱ्यांनी बेदाणा सौदे बंद केले आहेत. बेदाण्याची विक्री कशी करायची... बेदाणा विकला नाही तर कर्जाची परतफेड कशी करायची? द्राक्षाच्या हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करणे मुश्कील झाले आहे. व्यापाऱ्यांकडून ॲडव्हानस देखील मिळत नाही. त्यामुळे आमच्यावर आर्थिक संकट आले आहे, अशी व्यथा बेदाणा उत्पादक शेतकरी मांडत होते.
सांगली आणि तासगावच्या व्यापारी असोसिएशनने वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे या दोन्ही बाजार समित्यांमध्ये बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला. सुमारे पंधरा दिवस म्हणजे शुक्रवार (ता. ३०) पर्यंत हे सौदे बंद राहणार आहे. व्यापारी असोसिएशनने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मूळात एका बाजूला शासनाने बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेदाण्यास प्रति किलोस १५० ते २४० असा दर होता. बेदाण्याचे दर स्थिर होते. त्यामुळे बेदाणा विक्रीसाठी शेतकरी पुढे येत होते. गेल्या दोन वर्षापेक्षा यंदा बेदाण्याला अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
बेदाण्याचा हंगाम संपत आला आहे. वास्तविक पाहता बेदाणा तयार झाला की, शेतकरी बेदाणा विक्रीसाठी तासगाव आणि सांगलीच्या बाजारात सौद्यासाठी लावतो. या सौद्यात २५ ते ३० टक्के बेदाणा विकतो आणि राहिलेला बेदाणा हा शीतगृहात ठेवला जातो. गणपती, दसरा, दिवाळी आणि बेदाण्याच्या दरात वाढ झाली त्याची विक्री करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. त्या दृष्टीने शेतकरी नियोजन करत असतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने व्यापाऱ्यांनी सौदे न काढण्याचा निर्णय घेतल्याने सौदे बंद आहेत.
शेतकऱ्यांपुढे अडचणी
व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स मिळेना शेतकरी शीतगृहात बेदाणा ठेवतात. शेतकऱ्याला आर्थिक गरज असले तर शेतकरी व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स रक्कम मागून घेऊन आपली आर्थिक नड काढत असतो. परंतू व्यापाऱ्यांनी सौदे बंद केले आहेत. त्यामुळे बेदाण्याची विक्री होत नाही. परिणामी व्यापाऱ्यांच्या हातातही पैसा येत नसल्याने आम्ही कोठून ॲडव्हान्स द्यायचा, असा सूर व्यापारी वर्गातून येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स मिळेल, अशी आशा होती. आता व्यापाऱ्यांकडून देखील ॲडव्हान्स मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्यांनी बेदाण्याचे सौदे बंद ठेवले असल्याने आम्ही बेदाणा विकायचा कसा? व्यापाऱ्यांकडे ॲडव्हान्स मागितला तरी, ॲडव्हान्स मिळत नाही. कर्ज आणि शेतीसाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सौदे सुरू झाले पाहिजे. - मच्छिंद्र माळी, बेदाणा उत्पादक शेतकरी कवठेमहांकाळ, जि. सांगली
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.