आजरा, जि. कोल्हापूर : शेती हा व्यवसाय नाही ती संस्कृती आहे. शेतीमध्ये धान्य पिकवून शेतकरी भूक भागवतो. भुकेची किंमत जगात कोणाला करता येत नाही. हे सत्य असताना केंद्रशासन नवीन कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्याला देशोधडीला लावत आहे. त्यांनी या कायद्याद्वारे घेतलेली धोरणे ही भांडवलदारांना धार्जिणे असून, याचे देशात दूरगामी परिणाम होणार आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथील गंगामाई वाचन मंदिरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भात विक्रीचा प्रारंभ व शेतकरी मेळावा झाला. भात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेशाचे वाटप शेट्टी यांच्या हस्ते केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, उद्योजक महादेव पोवार उपस्थित होते. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष इंद्रजित देसाई यांनी स्वागत केले. जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई प्रास्ताविक केले. शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी जसा विक्रेता आहे. तसा ग्राहक देखील आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना चांगला तांदूळ मिळावा त्याचबरोबर आजऱ्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी हे खरेदी केंद्र संघटनेने सुरू केले आहे. शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ कॉ. देसाई, उद्योजक पोवार व मुकुंदराव देसाई यांची भाषणे झाली. बसवराज मुत्नाळे, संजय देसाई, अप्पासाहेब सरदेसाई, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, तुळशीराम पोवार, पांडुरंग गाडे, संजय घाटगे, सुरेश पाटील उपस्थित होते. कृष्णा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.