विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये : राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

सातारा  : राजकीयदृष्ट्या त्रासदासक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे. महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाऊ नये. सध्या तरी त्यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण ‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. 

राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. ४) साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभेत विरोधी पक्षांची ताकद दाखविण्यासाठी तसेच जनसामान्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणारा खासदार हवा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न केंद्रात ताकदीने मांडणारे विरोधी पक्षांचे खासदार असणे आवश्‍यक आहेत. मात्र, दुर्दैवाने विरोधी पक्षाचे खासदार कमी झाले असून पोकळी निर्माण झाली आहे. सध्या भाजपचे तीन कार्यकर्ते आहेत. एक सीबीआय, दुसरी ईडी आणि तिसरा आयकर विभाग. यांचा गैरवापर करून भाजपने मेगाभरती सुरू केली आहे. सीबीआयला इतर प्रश्‍न दिसत नाहीत. विविध आर्थिक गैरव्यवहार झाले त्याच्या चौकशीत ‘ईडी’ला रस नाही. चार वर्षांपूर्वी ‘ईडी’च्या संचालकांना मी सहकारी साखर कारखान्यांचा साखर विक्री घोटाळा पुराव्यासह दिला होता. हवालाचा प्रकारही लक्षात आणून दिला होता. मोडीत निघालेले सहकारी साखर कारखाने खासगी झाल्यावर फायद्यात कसे आले, ते खरेदी करणाऱ्यांकडे पैसे कुठून आले याबाबत आयकर विभागालाही लक्षात आणून दिले होते. पण याची चौकशी करण्यात त्यांनी रस दाखविला नाही.

राज्यात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. मुळात केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. पण विरोधी पक्ष दुबळा राहिल्यास जनमानसाचा आवाज दाबला जाणार आहे. सर्वजण एकाच पक्षात जायला लागल्यास एकपक्षीय राजवट निर्माण होण्याचा धोका असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

‘पूरग्रस्त वाऱ्यावर’  कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. पूरस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. घरांच्या नुकसानीत सानुग्रह अनुदान देताना पात्र लोकांची यादी मोठी, पैसे कमी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अपात्र लोकांची नावे या यादीत घुसवायची, गावागावात तंटे निर्माण करायचे आणि वाटप थांबवायचे असा प्रकार सुरू आहे. केवळ बाहेरून आलेल्या मदतीवर पूरग्रस्त अवलंबून आहेत. शासनाकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. त्यांना काहीही करायचे नाही, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडायचे आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com