‘स्वाभिमानी’ ४९ जागा लढविण्याची तयारी : राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

पुणे: विधानसभेच्या निवडणुका आम्ही महाआघाडीबरोबर लढण्यास इच्छुक आहोत. त्याची चर्चा पुढील महिन्यात होईल. मात्र, काहीही झाले तरी ४९ जागा लढविण्याची तयारी आम्ही केली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बुधवारी (ता. ३) पत्रकारांशी ते बोलत होते. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रवक्ते अनिल पवार या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. शेट्टी म्हणाले, की मी स्वतः निवडणूक लढविणार नाही. आम्ही पुढील महिन्यात अंतिम यादी जाहीर करू. भाजप-शिवसेना सोडून इतरांशी चर्चा केली जाईल.एचटीबीटी बियाणे आणणाऱ्या यंत्रणेवर आधी गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांवर परस्पर कारवाई नको. अन्यथा आंदोलन करू, असे सांगून श्री. शेट्टी म्हणाले, की ‘स्वाभिमानी’ कार्यकारिणीतील सर्व ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. शासनाने कर्जमाफी व वीजबिलमाफी हे दोन्ही निर्णय त्वरित घ्यावेत.  ‘शेतकरीवर्गाचा भ्रमनिरास करू नका’ हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पडल्याने फार काहीही झालेले नाही. तुम्ही ते मनातून काढून टाका आणि कामाला लागा. शेतकरीवर्गाचा भ्रमनिरास होईल असे वागू नका. आपली ही संघटना आपले मोठे घर आहे. भांड्याला भांडे लागून आवाज होतोच; पण आवाज इतका मोठा नको, की घराची शांतता भंग होईल, असा आदेश श्री. शेट्टी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. मंजूर झालेले महत्त्वाचे ठराव असे

  • दुष्काळ हाच निकष धरून ज्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्या जिल्ह्यांतील पीकविमा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची जोखीम रक्कम तत्काळ द्यावी. २० जुलैच्या आत शेतकऱ्यांना खरिपाकरिता पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅंकांना आदेश द्यावेत. पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्यास कार्यकर्त्यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. 
  • सतीश सुंदरराव सोनवणे (मु.पो. आदेगाव, ता. माजलगाव, जि. बीड) या शेतकऱ्याने लोकमंगल माउली शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्यास ऊस पुरविला होता. अनेक हेलपाटे घालूनही ऊसबिल मिळाले नाही म्हणून त्या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. हा कारखाना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा आहे म्हणून पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करणे टाळले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व नैतिक जबाबदारी स्वीकारून सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा. 
  •     राज्य शासनाने दुधाच्या प्लॅस्टिक पिशवीबंदीचा फेरविचार करावा. यामुळे शेतकरी व ग्राहक या दोघांचेही नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन साह्य बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी कोसळले आहेत. त्यामुळे केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान सुरू करावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com