देशात सांप्रदायिक विचारांचा ज्वर : शरद पवार

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शरद पवार
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शरद पवार

मुंबई : देशात सांप्रदायिक विचारांचा ज्वर आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. समाजाला एकसंध न ठेवणारी विखारी पद्धत संसदेतही दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. १०) आयोजित मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की आज राष्ट्रवादी काँग्रेस २० वर्षे पूर्ण करून २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. २० वर्षे होऊन गेली. बरीच स्थित्यंतरे येऊन गेली. महाराष्ट्र तसेच गोवा मंत्रिमंडळात संधी मिळाली. पक्ष स्थापन झाल्यावर सत्तेत येणारा एकमेव पक्ष होता, हे तुमच्यामुळे घडले. सत्ता आल्यावर पाया व्यापक करण्याचे काम आपण केले. संघटनात्मक विस्तार वाढवत होतो. दुसऱ्या बाजूला सत्तेतील लोकही लोकांची कामं करत होते. त्यामुळे काम करून घ्यावे ते राष्ट्रवादीकडून, हे चित्र राज्यात आपल्या पक्षाचे होते. 

राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेली जलदिंडीची संकल्पना पाण्याचे महत्त्व सांगणारी आहे. मुंबईत पक्षाचा विस्तार वाढवायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे फक्त ग्रामीण चेहरा असा समज आहे. तो असणारच; परंतु प्रत्येक तालुक्यात नागरीकरण झालेले आहे. ५० टक्के लोकसंख्या नागरीकरणात आली आहे. नागरी परिसरात पक्षाची व्याप्ती कशी वाढेल याकडे लक्ष देऊया, असे  श्री. पवार यांनी सांगितले. 

अपयशाने खचून न जाता ज्या जनतेने आपल्याला आधार दिला, आपल्याला तारले, त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. पक्षाची ताकद वाढवूया आणि महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आणूया, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  

लोकसभेची चर्चा आता बस्स झाली. तो निकाल कसा लागला, कुणी लावला यावर चर्चा नको. आगामी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या. ‘ईव्हीएम’ला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. 

९० दिवसांचा काळ कमी असला तरी २०१९ मध्ये आपल्याला निवडणूक जिंकून लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढायचा आहे, त्यामुळे त्या तयारीला लागा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेश आणि त्यानंतर मुंबई विभागीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंबई विभागीय कार्यालयापासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानपर्यंत जलदिंडी काढण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com