रत्नागिरी ः प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन देणारे पीक म्हणून नाचणीकडे पाहिले जात आहे. औषधी गुणधर्मामुळे ग्रामीण भागात नाचणीकडील कल वाढू लागला आहे. जिल्ह्यात यंदा ९ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. भविष्यात त्या भरघोस वाढ अपेक्षित आहे. भातशेतीबरोबरच नाचणीची कापणीही अंतिम टप्प्यात आली आहे.
काही वर्षापूर्वी भातशेतीसोबत नाचणी हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे हमखास पीक मानले जात होते. वातावरणाचा ताण सहन करणारे आणि कमी पाण्यात होणाऱ्या या पिकांची वेगाने वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांवर कीड-रोग समस्या कमी आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातून नाचणीचे पदार्थ काहीसे गायब झाल्याने नाचणीचे क्षेत्रही घटू लागले. नाचणीसारख्या तृणधान्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा, म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने नाचणीसह अन्य पिकांना तृणधान्य पिके म्हणून घोषित केले.
या पिकांचे महत्त्व शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी २०१८-०१९ ला राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून शासनाने जाहीर केले होते. लागवड वाढीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून कंबर कसली. त्याला काही प्रमाणात यशही आले. तालुक्याच्या पश्चिम भागासह पूर्व भागामध्ये पारंपरिक पद्धतीने नाचणीची लागवड केली जाते. भातशेतीसोबत नाचणीची पिकेही आता परिपक्व झाली असून, नाचणीची झोडणी वेगाने सुरू आहे.
नाचणी पिकात चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय घटक असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळूहळू रक्त प्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्याचे विकार आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.