रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत दाणाच भरला नाही !

फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार पावसासामुळे भाताच्या लोंबीत ‘दाणा’च (चिम) भरला नसल्याची स्थिती रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी आढळून आली आहे. त्याचा भात उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील शेतकरी भात झोडणी करताना.
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील शेतकरी भात झोडणी करताना.

रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार पावसासामुळे भाताच्या लोंबीत ‘दाणा’च (चिम) भरला नसल्याची स्थिती रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी आढळून आली आहे. त्याचा भात उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. यंदा खरीप हंगामात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात यंदा खंड पडू दिला नव्हता. शेतीचीही कामे अगदी वेळेत सुरू झाली. जुलै महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे नदी किनारी भागातील भातशेतीला मोठा फटका बसला. मात्र अन्य तालुक्यांमध्ये स्थिती समाधानकारक होती. यावर्षी तुलनेत भातपिकावर किड रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. जिल्ह्यात ४८२ गावांतील ६६३७ शेतकर्‍यांचे १ हजार ३६४.३३ हेक्टरपेक्षा अधिक पीकक्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या भात शेतीची कापणी वेगात सुरू आहे. सुमारे ४५ ते ५० टक्के भातकापणी पूर्णत्वास गेल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे.  या हंगामात पर्जन्यमान चांगले राहिले, भातरोपेही चांगली पोसली. पण भाताला फुलोरा येण्याच्या काळात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे येथे काही शेतकऱ्यांनी याबाबत माहिती दिली. भाताला लोंब आली, पण त्यात दाणे अल्प तर उर्वरित ‘चिम’ अशी अवस्था पाहून शेतकरी गलितगात्र झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात वेतोशी येथे कृषी विभागाकडून भात पिक प्रयोग केला होता. त्यामध्येही गुंठ्याला ३० क्विंटल भात मिळाले आहे. अपेक्षेपेक्षा कमी भात मिळाले असून, त्याला शेवटच्या टप्प्यात पडलेला पाऊसच कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरवर्षी चांगले भातपीक हाती मिळेल, यासाठी शेतकरी खरिपात मोठे कष्ट घेतो. संकरित बियाणी, खते, अलीकडे यांत्रिक अवजारांचाही वापर करून शेतीसाठी मोठी मेहनत घेत असताना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असते. या वेळेस तर चांगला पाऊस पडला, चांगले भातपीक उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. भात बियाण्यांतील भेसळ की त्यावर रोगाचा, धुवाधार पावसाचा परिणाम असा प्रश्‍न उभा आहे. या शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाने आढावा घेण्याची गरज आहे.  - तानाजी कुळ्ये, शेतकरी

भात व अन्य पिकावर दाणा तयार होण्याच्या काळात जर जोरदार पावसाचे प्रमाण राहिले तर दाणा तयार होण्यावर परिणाम जाणवतो. या वेळेस पीक फुलोरा तयार होण्याचा कालावधी व जोरदार पावसामुळे अशा प्रकारे पोचट भाताच्या पीक उत्पादनाची स्थिती निर्माण होऊ शकते. पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. - एन. व्ही. हेगडे, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com