सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत पावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार म्हणून तातडीची मदत द्यावी, पीक नुकसानीबद्दल प्रतिहेक्टर ५० हजार रुपये, तर बागायत पिकांना १ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षीही परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करीत आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस पडला आहे. हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. बांध, भराव फुटल्याने जमिनीवरील माती वाहून गेली आहे. यामुळे सरकारने पंचनामे, पाहणी दौरा थांबवून तातडीची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संबळ अन् डपलीचा गजर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी पूजा करून आंदोलकांनी जागरण, गोंधळ घातले. संबळ व डपलीचा गजर करीत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये सुहास पाटील, छगन पवार, सोमा भोसले, सुनील पाटील, राहुल बिडवे, सोमा पाटील, बळिराम गायकवाड, सुधाकर पांढरे, अमोल गवळी, दत्तात्रेय गायकवाड, प्रशांत करळे, अण्णा जाधव आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.