शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस करतात वसुली

शेतीमाल वाहतूकदारांकडून पोलिसांची वसुली
शेतीमाल वाहतूकदारांकडून पोलिसांची वसुली

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच हवालदिल शेतकऱ्यांकडून वाहतूक पोलिस जबरी वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीमाल विक्रीसाठीची वाहने अडवीत पोलिसांकडून ही वसुली केली जात आहे. 

दुर्गम मेळघाटात हा आदिवासीबहुल भाग आहे. या भागातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कपाशी, तूर, सोयाबीन या सारखी पीके मेळघाटातील शेतकऱ्यांव्दारे घेतली जातात. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे पीकाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. एकरी दहा क्‍विंटल अपेक्षा असलेल्या सोयाबीनने तर शेतकऱ्यांना पुरते निराश केले. 

काही शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड क्‍विंटलचाही उतारा मिळाला नाही.कपाशीचीस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत काही अंशी निघालेला शेतीमाल विकून रबी हंगाम तसेच कुटुंबांच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. कमी खर्चात वाहन करुन हा शेतीमाल अचलपूर बाजार समितीपर्यंत शेतकरी नेत आहेत. परंतू मेळघाटातील घाटवळणावर अशी वाहने वाहतूक पोलिसांकडून अडविण्यात येत या वाहनधारकांकडून वसुलीचे काम होत असल्याचा आरोप आहे. 

पोलिसांकडून नाहक सुरू असलेल्या या छळवादाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना भेटत या त्रासापासून मुक्‍ती देण्याची मागणी केली आहे. मेळघाटातून शेतीमाल आणणाऱ्या वाहनधारकांकडून १०० ते ५००० रुपयांची वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. ही लुबाडणूक थांबविण्याची मागणी हिरामण बेलसरे, विष्णू खडके, मारुती सालोमन, देविदास खडके, सीताराम सावलकर, श्रीराम बेलसरे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com