सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. आतापर्यंत एक हजार एकरासाठी पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदणी केल्याशिवाय आवर्तन सुरू करता येत नसल्याचा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
त्यामुळे म्हैसाळचे आवर्तन सुरू होण्यात विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी, दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई भासण्यास सुरू होईल. वेळेत पाणी सुरू झाले तरच पाणीटंचाई भासणार नाही आणि उन्हाळी पिकांसह अन्य पिकांना वेळेत पाणी देता येईल.
मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्यांमधील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे यांनी जलसंपदा विभागाला केली आहे. परंतु या मागणीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता योजनेचे आवर्तन सुरू करायचे असल्यास शेतकऱ्यांनी पाणी मागणीची नोंदणी करावी, असा नियम लागू गेला आहे.
मागणी आल्यानंतरच योजनेचे आवर्तन सुरू होणार. तोपर्यंत पाणीटंचाईची भीषणता वाढली जाणार. पाणी वेळेत मिळाले नाही तर त्याचा फटका पिकांना बसला जाणार आहे. आवर्तन सुरू करण्यासाठी ५० हजार एकरांसाठी मागणीची गरज आहे. तरच आवर्तन सुरू होईल.दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाणी मागणीची नोंदणी करावी, असे आवाहनदेखील करण्यात आले होते. त्यानुसार एक हजार एकर मागणीच आली आहे. दहा ग्रामपंचायतींनी पाण्याची मागणी केली आहे.
म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांची हवी तशी मागणी आलेली नाही. किमान ग्रामपंचायतीकडून तरी मागणी अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनीही तातडीने अपेक्षित नोंदणी करावी लागेल. दहा दिवसांत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. - सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना
नोंदणीनंतर येणार वेग
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.