कृषी ‘सीईटी’साठी नावनोंदणीला प्रारंभ

राज्यात बारावीच्या परीक्षा झालेली नसल्याने कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कशी होणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती.
agri edu
agri edu

पुणे ः राज्यात बारावीच्या परीक्षा झालेली नसल्याने कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कशी होणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता परीक्षा घेण्याचे निश्‍चित झाले असून, नावनोंदणी देखील सुरू झाली आहे. 

एरवी बारावीची परीक्षा होताच ‘सीईटी’ची प्रक्रिया जाहीर केली जाते. यंदा कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर बारावीच्या परीक्षा झालेल्याच नाहीत. त्यामुळे ‘सीईटी’ केव्हा आणि कशी होणार, त्यासाठी अभ्यासक्रम नेमका कसा राहील याविषयी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना चिंता लागून होती. आता यातील संभ्रम दूर करण्यात आला आहे. ‘सीईटी’साठी अकरावीचा २० टक्के, तर बारावीचा ८० टक्के अभ्यासक्रम राहणार आहे. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी कृषी ‘सीईटी’च्या नियोजनाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया येत्या सात जुलैपर्यंत चालणार आहे. अर्थात, विलंब शुल्कासह १५ जुलैच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणीची संगणकीय प्रणाली सुरू राहणार आहे. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की कृषी क्षेत्रातील आठ विद्याशाखांसाठी ‘सीईटी’द्वारे प्रवेश मिळणार आहेत. राज्यात यंदा १८९ महाविद्यालयांमधील १५ हजार २५७ जागांवर प्रवेश दिले जातील. यात ३८ सरकारी महाविद्यालये असून, १५१ महाविद्यालये खासगी शिक्षण संस्थाचालकांची आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून ‘सीईटी’च्या तयारीला लागावे. 

सलग दोन वर्षांपासून ‘सीईटी’चे वेळापत्रक विस्कळित होते आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताच धास्तावलेल्या पालकांनी ‘सीईटी’ पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. यंदा बारावीच्या परीक्षा न झाल्यामुळे ‘सीईटी’साठी नेमका कोणता अभ्यासक्रम असेल याविषयी विद्यार्थी चिंतेत होते.  सर्व प्रवेश ‘सीईटी’वर होणार  कृषी पदवीसाठीचे सर्व प्रवेश यंदाही पूर्णतः ‘सीईटी’च्या गुणांच्या आधारावरच होणार आहेत. या आधी ‘सीईटी’ पेपरचा ७० टक्क्यांचा स्कोअर आधी पकडला जात होता. उर्वरित ३० टक्क्यांसाठी बारावीत मिळालेली गुण गृहीत धरले जात होते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा असल्याने कृषी प्रवेशासाठी सर्वंकष निकष फक्त ‘सीईटी’च्या गुणांचेच ठेवण्याची शिफारस केली गेली व ती गेल्या दोन वर्षांपासून अमलात आणली जात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com