सोयाबीन बियाणे प्रकरणात उत्पन्नावर आधारीत नुकसान भरपाई शक्य

निकृष्ट बियाण्यामुळे उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कृषी विभाग, बाधित शेतकरी आणि संबंधित कंपनीच्या समन्वयातून उत्पन्नावर आधारीत हमी भावाचा आधार घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल.
soybean
soybean

नगर ः निकृष्ट बियाण्यामुळे उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कृषी विभाग, बाधित शेतकरी आणि संबंधित कंपनीच्या समन्वयातून उत्पन्नावर आधारीत हमी भावाचा आधार घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल. असा प्रयोग चोवीस वर्षापूर्वी (१९९६-९७) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झाला. या माध्यमातून २९ शेतकऱ्यांना १ लाख ३० हजार ५६० रुपये भरपाई दिली होती. त्याच धर्तीवर यंदाही भरपाई देता येऊ शकते, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.  निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने यंदा राज्यभरात खरिपातील सोयाबीन, बाजरीसह अन्य काही पिकांची उगवण झाली नाही. त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करुन बियाणे उगवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यात काही कंपन्यांनी बियाणे बदलून दिली, तर काही कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र दुबार पेरणीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि खरिपातील पिके येण्यालाही उशीर होणार असल्याने उत्पादनात फरक पडू शकतो, असा कयास असल्याने अनेक शेतकऱ्यांची बियाणे बदलून घेण्यास तयार नाहीत.  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व इतर खाजगी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अजूनही सुरु आहे. मात्र निकृष्ट बियाण्यांमुळे उगवण झाली नसल्याने झालेल्या नुकसानीवर समन्वयातूनच तोडगा निघू शकतो आणि शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, हे राज्यात चोवीस वर्षापूर्वीच स्पष्ट झालेले आहे. १९९६-९७ साली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील २९ शेतकऱ्यांनी पेरलेल्या ‘महाबीज’च्या खरीप ज्वारीच्या बियाण्याची उगवण झाली नव्हती. त्यामुळे  शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी विकास अधिकारी आणि सध्या ‘पोकरा’चे अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी पुढाकार घेत शेतकरी, ‘महाबीज’ व कृषी विभाग यांच्या समन्वयातून तोडगा काढत ज्वारीचे उत्पादन हाती आल्यावर शेतकऱ्यांना महाबीजकडून १ लाख ३० हजार रुपयांची भरपाई मिळून दिली होती. त्याच धर्तीवर यंदाच्या नुकसानीची भरपाई देता येऊ शकते, असे शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे यांनी सांगितले. यांच्या समन्वयाने तोडगा का़ढून शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. असा काढला होता तोडगा जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी विकास अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, जिल्ह्यात ‘महाबीज’च्या खरीप ज्वारीच्या बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंचनामे केले. मात्र भरपाईसाठी इतर बाबींचा अवलंब करण्याऐवजी नुकसान झालेले शेतकरी आणि ‘महाबीज’चे प्रतिनिधी यांच्यात समन्वय बैठक घेतली. संबंधित वाणाची पेरणी झालेल्या त्या-त्या भागातील पीक कापणी प्रयोगातून चांगल्या आलेल्या पिकाचे व खराब आलेल्या पिकाचे सरासरी ९ क्विटंल उत्पादन काढले आणि त्याला त्यावेळच्या ३१० रुपये प्रती क्विंटल हमीदरानुसार २९ शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार ५६० रुपये नुकसान भरपाई दिली. त्यामुळे वाद-विवाद आणि बियाणे कंपनीवरील नाराजी टळली होती. बैठकीत ठरल्यानुसार एक वर्षानंतर ही भरपाई मिळाली होती तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यासारखे झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com