पावसामुळे खरिपाला संजीवनी

राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मात्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ऐन पेरणी काळात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, उत्पादनात १५ ते २० टक्के घट शक्य आहे. - कुलगुरू डॉ. विलास भाले, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
पीक जोमात
पीक जोमात

पुणे: राज्याच्या विविध भागांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला संजीवनी मिळाली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने यापूर्वी रखडलेल्या भात रोवण्यांना जोरदार सुरवात झाली असून ऊस लागवडीला देखील वेग येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी संचालक विजयकुमार घावटे म्हणाले, की राज्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. यापूर्वी पेरा झालेल्या भागात चांगल्या पावसामुळे उगवण चांगली राहील. ऊस आणि धानाची लागवड पुढे सरकत नव्हती. मात्र, चालू पावसाने ती अडचणही दूर होईल. पूर्व विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात धान रोवण्यांना वेग आलेला आहे. ऊस लागवडीसाठी काही भागांत पोषक स्थिती तयार झालेली आहे.

पावसाअभावी धानाची पेरणी पुढे सरकत नव्हती. राज्यात १५ लाख हेक्टर धानाचे क्षेत्र असताना जुलैअखेर सव्वासहा लाख हेक्टरवर पेरा झालेला होता. नाशिक जिल्ह्यात ३३ टक्के तर नागपूर ५, भंडारा १२, गोंदिया १४, चंद्रपूर १४ तर गडचिरोलीत २० टक्के धान लागवड झालेली होती. मात्र, या भात उत्पादक जिल्ह्यातील रोवण्यांची चिंता आता दूर झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात राज्याच्या काही जिल्ह्यांत खरिपासाठी अतिशय उत्तम पाऊस झाला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात १०१ मिलिमीटर, सिंधुदुर्ग १६० तर कोल्हापूरला १३४, नाशिक ३३, सातारा ४९ तर पुणे जिल्ह्यात २९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठची शेतजमीन व पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत अहवाल अजून मिळालेले नाहीत, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

राज्यात एक जूनपासून सहा ऑगस्टपर्यंत एकूण सरासरी पाऊस ६८४ मिलिमीटर होतो. मात्र, प्रत्यक्षात ७१७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झालेला आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे १३४ मिलिमीटर तर कोकण १३२, नाशिक ११२, औरंगाबाद ७६, अमरावती ८९ तर नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी ८६ टक्के पाऊस झालेला आहे. यामुळे दुबार पेऱ्याचे काही भागातील संकट दूर झालेले आहे.   

राज्याच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सरासरीच्या तुलनेत १४७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. ७५ टक्के ते १०० टक्के पाऊस १३६ तालुक्यांमध्ये आहे. ६६ तालुक्यांमध्ये अजूनही ५० ते ७५ टक्के पाऊस आहे. राज्यातील चार तालुक्यांमध्ये मात्र ५० टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला नाही. त्यामुळे या तालुक्यांसाठी खरिपाची चिंता कायम आहे. 

९५ तालुक्यांमध्ये कमी पाऊस  राज्यात जून ते सप्टेंबर एकूण सरासरी पाऊस ११३१ मिलिमीटर होत असतो. आतापर्यंत या सरासरीच्या ८७ टक्के पाऊस राज्यात झालेला आहे. गेल्या चोवीस तासात ५० मिलिमीटरपेक्षा जादा पाऊस ५० तालुक्यांमध्ये झाला. २९ तालुक्यांमध्ये २५ ते ५० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. ९५ तालुक्यांमध्ये अडीच मिलिमीटरपर्यंतच पाऊस झाला आहे. अर्थात, यामुळे खरीप हंगामाला चालना मिळणार आहे. 

प्रतिक्रिया चांगल्या पावसामुळे सर्व पिकांच्या पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. केवळ धान व ऊस लागवड पिछाडीवर दिसतेय. मात्र, धान रोवण्यांना आता वेग आला असून ऊस लागवडीसाठीही पोषक स्थिती तयार होते आहे. - विजयकुमार घावटे, गुणनियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com