कृष्णा खोऱ्यातील उर्वरित पाणी वर्षभरात अडविणार

कृष्णा पाणीवाटप लवादाच्या पहिल्या निवाड्यानुसार राज्याच्या वाट्याला आलेले ५६० अब्ज घनफूट पाणी अडविणारे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत.
The remaining water in the Krishna Valley will be blocked throughout the year
The remaining water in the Krishna Valley will be blocked throughout the year

पुणे : कृष्णा पाणीवाटप लवादाच्या पहिल्या निवाड्यानुसार राज्याच्या वाट्याला आलेले ५६० अब्ज घनफूट पाणी अडविणारे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत. उर्वरित सहा सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण होताच सर्व पाणी अडविण्याची क्षमता राज्य प्राप्त करेल.

कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील हजारो गावांचे अर्थकारण बदलून गेले आहे. उर्वरित सहा प्रकल्प होताच आणखी काही तालुक्यांवर दुष्काळाचे मळभ दूर होणार आहे. प्रकल्पाचे पाणी खेळू लागताच बागायती शेतीचा विस्तार होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लागणार आहे. 

सिंचन विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आता फक्त ७.०७ अब्ज घनफूट पाणी अडविणे बाकी आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्यासाठी गेल्या पाच दशकांपासून कायदेशीर संघर्ष सुरू आहे. १९७६ मधील पहिल्या लवादाने राज्याला ५६० अब्ज घनफूट पाणी अडविण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी राज्याला १९९६ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती करावी लागली. महामंडळाने झपाट्यालासारखे काम करीत १०६९ सिंचन प्रकल्प उभारले. त्यामुळे राज्याच्या मंजूर वाट्यापैकी आतापर्यंत ९८.४५ टक्के म्हणजेच एकूण ५५२.९३ अब्ज घनफूट पाणी अडविले गेले आहे.”

धोम बलकवडी, तारळी, कृष्णा कोयना उपसा जलसिंचन योजना तसेच सांगोला शाखा कालवा असे मोठे प्रकल्प वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय वांग, कुडाळी, मोरणा गुरेघर हे मध्यम प्रकल्पदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अभियंते प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करीत आहे. याशिवाय केंद्राने बळिराजा जलसंजीवनी योजनेतील उरमोडी व टेंभू प्रकल्पांनाही भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील उर्वरित पाणी अडविण्यासाठी आर्थिक निधीची समस्या दूर झालेली आहे. 

कोविडमुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली. त्याचा परिणाम स्वनिधीतील सिंचन प्रकल्पांवर झाला. मात्र केंद्राकडून काही प्रकल्पांना ९० टक्क्यांपर्यंत निधी दिला आहे. त्यामुळे इतर समस्यांवर मात करून २०२२ अखेर सर्व पाणी अडविणारे प्रकल्प पूर्ण  होण्याची आशा वाटते, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जयंत पाटील, विलास राजपूत यांचा पाठपुरावा  कृष्णा खोऱ्यातील अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व खात्यातील लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव विलास राजपूत यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा चालू आहे. दोघांच्या समन्वयामुळे सर्व अडथळ्यांवर मार्ग काढत अभियंत्यांकडून एकेक प्रकल्प पूर्ण केला जात आहे. उर्वरित सहा सिंचन प्रकल्प पूर्ण करून पहिल्या लवादाच्या निवाड्याने आलेले सर्व पाणी लवकरात लवकर अडवावे, अशा सूचना या दोघांनी दिलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com