शेतीवरील लॉकडाऊन हटवा : किसान संघर्ष समन्वय समिती

रबी हंगामातील शेतीमालाची १०० टक्के खरेदी एमएसपी दराने व्हावी. खासगी व्यापाऱ्यांनाही एमएसपी दरानेच खरेदी बंधनकारक करावी.
शेतीवरील लॉकडाऊन हटवा : किसान संघर्ष समन्वय समिती
शेतीवरील लॉकडाऊन हटवा : किसान संघर्ष समन्वय समिती

नवी दिल्लीः रबी हंगामातील शेतीमालाची १०० टक्के खरेदी एमएसपी दराने व्हावी. खासगी व्यापाऱ्यांनाही एमएसपी दरानेच खरेदी बंधनकारक करावी. तसेच रबी हंगामातील शेतीमालाप्रमाणेच फळे आणि भाजीपाल्यासाठी देखील एमएसपी (किमान आधारभूत दर) जाहीर करावे, अशी मागणी देशभरातील शेतकरी संघटनांचा महासंघ असलेल्या अखिलभारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.  शेतकरी संघटनांनी म्हटले आहे, की सरकारने लॉकडाऊनमध्ये शेतीच्या कामांना सवलत दिली असल्याचे आदेश काढले आहेत. परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनाशी संपूर्ण देश घरात बसून आणि शेतकरी शेतात जाऊन लढतो आहे. या शौर्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असताना त्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री करावी लागते आहे. सरकारी खरेदी यंत्रणांचा अभाव हे त्यामागचे मोठे कारण आहे.  ‘‘गव्हाची एमएसपी १९२५ रुपये प्रतिक्विंटल आहे. पण खासगी व्यापारी अवघ्या १४०० ते १७०० रुपयांनी गहू खरेदी करत आहेत. त्यामुळे सरकारी खरेदी यंत्रणांनी शेतकऱ्यांकडून एमएसपी दरानेच शेतीमाल खरेदी करावा. केंद्र किंवा राज्यसरकारची यंत्रणा आर्थिक अडचणीमुळे खरेदी करू शकत नसेल तर खासगी व्यापाऱ्यांनी एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी करता कामा नये, असे बंधनकारक करावे. फळे आणि भाजीपाल्याची देखील अवघ्या दोन ते चार रुपये किलो, अशा पडत्या भावाने खरेदी सुरू आहे. त्यामुळे उत्पादकांना नाशवंत माल फेकून द्यावा लागतो आहे. या नाशवंत मालासाठीही एमएसपी निश्चित करावा,’’ अशी मागणी केली आहे.  कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायापुढील अडचणी पाहता शेतकरी संघटनांनी पंजाब, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे पत्रे लिहून या अडचणी दूर करण्याची मागणी केली आहेच, आता राष्ट्रीय पातळीवरील निर्णयासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून आवाहन केले आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे हनन मौला, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय संघटनेच्या मेधा पाटकर, किसान महापंचायतचे रामपाल जाट आदी या समन्वय समितीचे सदस्य आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com