बदलत्या वातावरणानुसार संशोधन आवश्‍यक : कुलगुरुंच्या संशोधकांकडून अपेक्षा

बदलत्या वातावरणानुसार संशोधन आवश्‍यक : कुलगुरुंच्या संशोधकांकडून अपेक्षा
बदलत्या वातावरणानुसार संशोधन आवश्‍यक : कुलगुरुंच्या संशोधकांकडून अपेक्षा

राहुरी, जि. नगर : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे चांगले काम चालू आहे. मात्र सगळ्या संशोधनाला योग्य प्रकारे प्रसिद्धी मिळत नाही. पूर्वी चार-पाच वर्षांनी दुष्काळ पडायचा, आता दर एक वर्षाला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार संशोधन होणे गरजेचे आहे. मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्याचे कष्ट कमी होतील आणि कार्यक्षमता वाढेल त्या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी येथे व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) यांच्यातर्फे ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठकीला (जॉइंट ॲग्रेस्को) ला बुधवारी (ता. २९) प्रारंभ झाला. या वेळी झालेल्या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलासराव भाले, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. के. व्ही. प्रसाद, डॉ. हरिहर कोसडीकर, डॉ. विलासराव खर्चे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. व्ही. एस. शिर्के, डॉ. अशोक फरांदे, विजय कोते, कुलसचिव सोपानराव कासार यांच्यासह राज्यभरात संशोधक उपस्थित होत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाकडून वर्षभर केलेल्या संशोधनाबाबतच्या शिफारसी जॉइंट ऑग्रोस्कोमध्ये मांडल्या जातात.

याप्रसंगी बोलताना डॉ. विश्वनाथा म्हणाले, ‘‘विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. तंत्रज्ञानाचा फायदा दिसायला पाहिजे. या संशोधनाचा शेतकऱ्यांच्या शेतीत किती फायदा झाला याचे विश्लेषण व्हायला हवे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आठ पिकांतून ९५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांवर सध्या तंत्रज्ञानाचे संकट नसून आर्थिक संकट आहे. त्यासाठी शेतीमालाला दर मिळणे गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. त्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित होणे गरजेचे आहे.’’

डॉ. भाले म्हणाले, ‘‘विद्यापीठातील शिक्षणाबाबत एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठात ‘संचालक शिक्षण’ या पदाची निर्मिती होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील संशोधनाला दहा वर्षे लागतात. खासगी कंपन्या मात्र चार वर्षात संशोधन करून वाण बाजारात येतात. याशिवाय आपले शास्त्रज्ञ अन्य कोणत्या देशात जातात हे पाहणे गरजेचे आहे. विद्यापीठ बियाणे संशोधन करून ‘महाबीज’ला देते. त्याची रॉयल्टी मिळणे गरजेचे आहे.’’

डॉ. धवण म्हणाले, ‘‘संशोधनाचा आकडा फुगला, पण कालबाह्य होण्याचे प्रमाणही अधिक आहे. सध्याच्या वातावरणाचा विचार करून तंत्रज्ञानाचा विचार होणे गरजेचे आहे. पुढच्या वेळी शिफारशी करताना कालबाह्य होत असलेल्या बाबींचाही विचार व्हावा. शेतकरी, निविष्ठा उत्पादक, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांच्या गरजा, अपेक्षा याचा विचार करून संशोधन व्हावे, मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कार्यक्षमता वाढेल त्या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे.’’

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘आपल्याकडे एकाच विषयावर संशोधन करताना त्यावर जास्त वेळ न देता बदल केले जातात. नवीन वाणाच्या संशोधनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. अन्य बाबीवर प्रक्रिया करताना त्यातून टाकाऊ बाबींचा विचार केला जात नाही. टाकाऊ बाबींचे काही करता येईल का, यावर विचार करून संशोधन होणे गरजेचे आहे.’’ प्रारंभी डॉ. गडाख यांनी प्रस्तावीक केले. डॉ. कौसडीकर यांनी आभार मानले. गावरान चांगले, त्यात काय ते शोधा ‘‘विद्यापीठाने अनेक चांगले संशोधन केले असले तरी लोक  अजूनही गावरान वाण चांगले असे म्हणतात. गावरान चांगले का आहे, त्यात चांगल्या बाबी काय आहेत. याचा विचार करून त्यावर संशोधन व्हावे. नवीन संशोधन करताना जुन्या बाबी, कालबाह्य होत असलेले संशोधनही तपासणे गरजेचे आहे,’’ असे मत कुलगुरू डॉ. सावंत यांनी व्यक्त येथे केले. साडेचारशे शास्त्रज्ञ सहभागी राहुरी कृषी विद्यापीठात होत असलेल्या जॉइंट ॲग्रेस्कोमध्ये राज्यातील चारही विद्यापीठातील मिळून साडेचारशे शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. तेरा वेगवेगळे वाण, सतरा यंत्रे, १८२ संशोधन शिफारसी मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आज गुरुवारी यावर चर्चा होणार असून १३ गट करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com