संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाट

संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.
orange export
orange export

नागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. या ‘किसान रेल्वे’ला संत्रा पट्ट्यातून शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून सात फेऱ्यांच्या माध्यमातून आजवर दिल्लीपर्यंत सुमारे पंधराशे टन संत्र्याची वाहतूक करण्यात आली आहे. विदर्भाचे मुख्य फळपीक म्हणून संत्र्याची ओळख आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ७० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर २५ हजार हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यात संत्र्याखाली आहे. तर केवळ पाच हजार हेक्‍टर क्षेत्र राज्याच्या इतर भागात विखुरलेले आहे. या भागातून संत्र्याची खरेदी करून पश्चिम बंगाल पर्यंत रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्री पोचविली जातात. तिथून बांगलादेशला संत्र्याची निर्यात केली जाते.  बांगलादेश नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार आहे. बांगलादेश अगोदर दिल्ली तसेच दक्षिणेतील राज्यातून देखील संत्र्याला मागणी राहते. या सर्व राज्यांमध्ये तसेच बांगलादेशपर्यंत संत्रा फळे पोहोचविण्याकरता रस्ते वाहतूक हा एकमेव पर्याय आजवर उपलब्ध होता. हा पर्याय खर्चिक आणि वेळकाढू ठरत होता. आता संत्रा वाहतुकीकरिता किसान रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त आणि कमी वेळेत संत्रा फळांची वाहतूक करणारा पर्याय उपलब्ध झाला आहे.  १४ ऑक्टोबरपासून किसान रेल्वेची सुरुवात झाली. दर बुधवारी वरूड ऑरेंज सिटी रेल्वेस्थानकावरून संत्र्याची ‘किसान रेल’ दिल्लीकरीता सोडली जाते. पहिल्यावेळी १२, पार्सल व्हॅन, दुसऱ्या फेरीत १७, तिसऱ्यांदा १२, चौथ्या फेरीत १५, पाचव्या फेरीत १०,  सहाव्या फेरीत १२,  सातव्या फेरीत ११ याप्रमाणे पार्सल व्हॕन बुकिंगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून ३१७ टन  संत्रा वाहतूक करण्यात आली. त्यानंतर २५०, २००, १७६ अशी सरासरी २०० टन संत्रा वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.  दिल्लीपर्यंत जाणाऱ्या ‘किसान रेल’ला शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने कोलकत्तामधील शालिमारपर्यंत देखील संत्रा वाहतुकीकरीता रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. शालिमारपर्यंत सोडण्यात आलेल्या पहिल्याच किसान रेल्वेच्या माध्यमातून १६६.६ टन संत्रा वाहतूक करण्यात आली. शालिमारपर्यंत सोडण्यात येणाऱ्या या ‘किसान रेल्वे’ची सुरुवात सांगोला येथून होते.

प्रतिक्रिया संत्रा वाहतुकीकरिता या भागातील शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. संत्रा फळ नाशवंत असल्याने कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचल्यास ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचेल आणि दर चांगले मिळतील. आत्मनिर्भर मिशन अंतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’मधून अन्नप्रक्रिया मंत्रालयाने दहा कोटी रुपये रेल्वेला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च ५० टक्केच लागतो. दिल्लीपर्यंत १५१२ रुपये प्रतिटन आकारले जातात. त्यामुळे व्यापारी, शेतकऱ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला.  - रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी,  वरुड, अमरावती.

‘किसान रेल’ला मिळत असलेल्या प्रतिसादामागे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कृष्णांत पाटील यांचे विशेष प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या माध्यमातून त्यांना वाटेल तितक्या वजनाचा माल पाठविता येणार आहे. ५० किलोपासून तर टनापर्यंत बुकिंग करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट दिल्लीच्या  बाजारपेठेपर्यंत शेतमाल पाठविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील काळात मार्केटिंग चेन शेतकऱ्यांनी तयार केल्यास त्याचे दुरगामी फायदे अनुभवता येतील. - संजय गंभीर, विपणन अधिकारी, वरूड ऑरेंज सिटी रेल्वेस्थानक

अशा जोडतात पार्सल व्हॕन

वरुड  ४
काटोल    १
नरखेड  १
पांढूर्णा   ३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com