एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार : डॉ. अनिल बोंडे

डॉ. अनिल बोंडे
डॉ. अनिल बोंडे

मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जमिनीवर एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

राज्यातील कृषी विकासाकरिता कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन व भविष्यात करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, व दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा संशोधनाबाबत आढावा घेण्यात आला. 

या वेळी डॉ. बोंडे म्हणाले, की कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान शिकवून त्यांना त्यांच्या जमिनीवर उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या उत्पादनाचा नियमित आढावा देखील घेण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे उपलब्ध जमीन, पाण्याचा साठा व उत्पादनासाठी पूरक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येईल. त्याचबरोबर शेती अर्थशास्त्राचा अभ्यास करताना विविध क्षेत्रातील हवामान अनुकूलता, विविध भागांतील जमिनींचा कस यानुसार उपयुक्त व अधिक उत्पादन देणाऱ्या महत्त्वाच्या पिकांचा आराखडा राज्यातील विविध क्षेत्रांनुसार तयार करण्यात यावा असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.

डॉ. बोंडे म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यातील हवामानानुसार पीक कार्यक्षमता क्षेत्र (क्रॉप इफिशियंट झोन) तयार करून त्यानुसार वाण, उत्तम शेतीपद्धती, प्रति हेक्टरी उत्पादन खर्च व उत्पन्न मापक निश्‍चित करण्यात यावे. याचा पीकविमा भरपाईवेळी लाभ होईल. तसेच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निती आयोगानुसार शिफारस करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पुढील उपाययोजना करण्यात याव्यात. उन्नत भारत अभियान आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे.

कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या संशोधनांची मार्गदर्शक तत्वे व सूचना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात, तसेच एकात्मिक शेतकरी कल्याण प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्याचे हवामान लक्षात घेऊन मंडळनिहाय पीक पद्धती व उत्पादकता याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी या वेळी दिले. तसेच कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत तसेच कृषी परिषदेचे संचालक आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com