रत्नागिरीत पुराचे पाणी, गाळाचा भातशेतीला धोका

भात पिकाला धोका
भात पिकाला धोका

रत्नागिरी ः पावसाने उघडीप घेतली असली, तरीही नदीकिनारी भागातील भातशेतीमधील पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ शेतात साचून राहिल्याने शेकडो एकर जमीन बाधित होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नदीकिनाऱ्यावरील विविध गावांतील सुमारे पाच चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेले होते. जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हाच जोर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नोंदला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांचा उगम आंबा घाट, महाबळेश्‍वरमधील डोंगररांगांमधून होतो. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. याचा फटका भातशेतीलाही बसला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील बहुतांश नदीकिनारी असलेली शेती आठ ते दहा दिवस पाण्याखाली होती. दापोली, राजापूरसह मंडणगडात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.  रत्नागिरी तालुक्यातही टेंबेपूल, सोमेश्‍वर, पोमेंडी परिसरातील शेतात काजळीच्या पुराचे पाणी घुसून जमीन नापीक बनली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाव नदीकिनाऱ्यालगत २.५ चौरस किलोमीटर शेतीक्षेत्र आहे. त्याला पुराच्या पाण्याचा फटका बसतो. मुचकुंदी किनारी ०.३५ चौकिमी क्षेत्र, सप्तलिंगी किनारी ०.१५ चौकिमी, काजळीला ०.७५, सोनवी १.०२ चौकिमी, गडनदी ०.६० चौकिमी, गडन ०.६५ चौकिमी क्षेत्राला पुराचा फटका बसतो. संगमेश्‍वर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा गावांतील शेतकऱ्यांना दुबार पिकाचीही संधी शिल्लक राहिलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com