आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर होणार परिणाम

त्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या पाच वर्षात तब्बल दोनवेळा आयात शुल्क वाढ केल्याने भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे.
Rising import duty will affect orange exports
Rising import duty will affect orange exports

अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या पाच वर्षात तब्बल दोनवेळा आयात शुल्क वाढ केल्याने भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे. याचा संत्रा निर्यातीवर देखी व्यापक परिणाम होण्याची भीती वर्तविली जात असून हे भारतीय राजकीय मुत्सद्देगिरीचे अपयश मानले जात आहे.  

विदर्भाचे मुख्य फळपीक अशी संत्र्याची ओळख. सुमारे दीड लाख हेक्‍टरवर विदर्भात संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ९५ ते एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. वरुड मोर्शी हे तालुके त्यामुळेच विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. उत्पादित संत्र्याला बाजारपेठ मिळवताना शेतकऱ्यांची दमछाक होते. एखाद्या वर्षी उत्पादन अधिक झाल्यास दर घसरतात तर काहीवेळा कमी दरामुळे शेतकऱ्यांना संत्रा फेकून द्यावा लागतो. 

नागपुरी संत्रा फळांची टिकवणक्षमता कमी असल्याने इतर देशांमधून त्याला मागणी कमी राहते. परिणामी निर्यात होत नाही. नागपुरी संत्राचा एकमेव आणि मोठा आयातदार बांगलादेश आहे. एकूण उत्पादनाच्या दीड लाख टन संत्रा एकट्या बांगलादेशला निर्यात होतो. मांसाहार पचविण्यासाठी  बांगलादेशी नागरिकांची संत्र्याला पसंती राहते. पश्चिम बंगाल मार्गे रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्रा भारतातून बांगलादेशला पोहोचविला जातो. पश्चिम बंगालमधील व्यापारी अमरावती जिल्ह्यातून थेट संत्रा खरेदी करतात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये संत्रा आणत त्या ठिकाणी निर्याती संदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पडली जाते. त्यामुळे संत्रा निर्यात विदर्भाऐवजी पश्चिम बंगालमधून होत असल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट होते. 

मोठ्या प्रमाणात नागपुरी संत्र्याची आयात बांगलादेशला होत असतानाही संत्रा फळाच्या निर्यातीबाबत बांगलादेश सरकारने अनेकदा धोरणात बदल केला आहे. पाच वर्षांपूर्वी बांगलादेश सरकारकडून आयात शुल्कात सरसकट दुपटीने वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पाच लाख रुपयांचा संत्रा बांगलादेशला निर्यात करायचा असल्यास त्यावर पाच लाख रुपयांचे आयात शुल्क मोजावे लागत होते. बांगलादेश सरकारच्या या धोरणाचा भारतातून तीव्र विरोध झाला. 

संत्रा उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या महाऑरेंजने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य व केंद्र सरकारस्तरावर पाठपुरावा केला. तत्कालीन वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील गडकरी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत बांगलादेश सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली. परंतु बांगलादेश सरकारने भारत सरकारच्या या विनंतीला धुडकावून लावले. त्यामुळे जशास तसे म्हणून बांगलादेशमधून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.परंतु भारत सरकारने आयात शुल्क वाढीचा कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे मजुरी वाढलेल्या बांगलादेशने शुल्कात कोणतीही कपात केली नाही. या उलट आता पुन्हा नव्याने आयात शुल्कवाढीचा निर्णय घेत भारत सरकारला थेट आव्हान दिल्याची चर्चा संत्रा उत्पादकांमध्ये आहे.

पाच वर्षात बांगलादेश सरकारने आयात शुल्कात दोनवेळा वाढ केली आहे. यापूर्वी तत्कालीन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात हे शुल्क दुपटीने वाढविण्यात आले होते. ते कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश आले नाही. आता पुन्हा बांगलादेशने शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. याचा संत्रा निर्यातीवर दूरगामी परिणाम होण्याची भीती आहे.   - श्रीधर ठाकरे,  कार्यकारी संचालक, महाऑरेंज

आयात शुल्क प्रति किलो ३१ रुपयांवरून ३८ रुपये ९० पैसे वाढ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com