रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावे जलमय

सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला दणका दिला. नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले. जगबुडी, बावनदी, अर्जुना, काजळी, वाशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावे जलमय
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावे जलमय

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्याला दणका दिला. नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले. जगबुडी, बावनदी, अर्जुना, काजळी, वाशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. पावसाचा जोर दिवसभर सुरूचं होता. चांदेराई, सोमेश्‍वर, माखजन भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरेच्या घरे पाण्याखाली गेली होती.

बुधवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पाऊस ८७.६८ मिमी इतका नोंदला गेला. त्यात मंडणगड ९२.३० मिमी, दापोली ४५.०० मिमी, खेड ५४.८० मिमी, गुहागर ९४.७० मिमी, चिपळूण ९६.४० मिमी, संगमेश्वर १३२.७० मिमी, रत्नागिरी ११२.५० मिमी, राजापूर ८२.९० मिमी, लांजा ७७.८० मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात १६०३.३६ मिलिमीटर पाऊस झाला. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही वाढतच आहे. पावसाबरोबरच वेगवान वाऱ्यांनी अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली असून नदीकिनारी भाग जलमय झाले आहेत. रायगडपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, सावित्री, बावनदी आणि काजळीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जवळच्या गावात पाणी शिरले. मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी, आंजणारी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पूल मंगळवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीने कालपासूनच धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेबरोबरच परिसरातील घरांमध्ये घुसले. अर्धी अधिक घरे पाण्याखाली गेली होती. पुराच्या शक्यतेमुळे ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले होते. चांदेराईबरोबरच सोमेश्‍वर मोहल्ल्यात काजळीच्या पुराचे पाणी घुसल्याने तेथील लोकांचे नुकसान झाले आहे. या नदीची नियमित पातळी १६.५० मीटर असून पावसामुळे ती १७.५० मीटर इतकी होती. बावनदीला आलेल्या पुराचे पाणी वांद्री बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. येथील ग्रामदेवता मंदिराला पाणी टेकले होते. पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. बावनदी ते पाली हा रस्ता बंद झाल्यामुळे वेळवंड, निवळी शेल्टी भागाचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटला होता. या भागातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती. पूर असाच राहिला तर भातशेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com