सातारा जिल्ह्यात पुरामुळे नुकसान साडेतीनशे कोटींवर 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : अतिवृष्टीकाळात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांना झळ बसली. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेरच्या टप्प्यात असून, आतापर्यंत ३५० कोटींचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती निर्माण होण्याआधी ११ हजार लोकांचे स्थलांतर केल्याने मनुष्यहानी झाली नाही. रस्ते, पुलांचे २९ कोटींचे तर १३४ पाणी योजनांचे तीन कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे. टेंभू योजनेला १४ कोटींचा फटका बसला आहे. 

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा सर्वाधिक फटका कऱ्हाड, पाटण, सातारा, जावळी व वाई तालुक्‍यांना बसला. पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या गावांत मदतकार्य सुरू झाले. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर नेमकी नुकसानी आकडेवारी किती, याची माहिती घेण्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले. यासाठी महसूल, कृषी, बांधकाम, पाटबंधारे विभागांनी संयुक्त पाहणी करून नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेण्यास सुरवात झाली.

पंचनामे अखेरच्या टप्प्यात आले असून, आतापर्यंत पाच तालुक्‍यांत साधारण ३५० कोटींचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या आपत्तीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तर ११ हजार कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले. त्यामुळे अधिक मनुष्यहानी टळली. तरीही पुरामुळे एक हजार ९७९ कुटुंबे बाधित झाली. या कुटुंबांना शासनाकडून आलेल्या मदतीचे वाटप करण्यात आले असून, आतापर्यंत एक कोटी ७२ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. तर शेती व पिकांचे १३ हजार हेक्‍टरवर नुकसान झाले असून, त्याची किंमत साधारण १९९ कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये ऊस, आले, हळद आणि खरीप पिकांचा समावेश आहे.

‘महसूल’कडील नुकसानीमध्ये कऱ्हाडमधील ४५५ विविध प्रकारची दुकाने व शॉपचे १८ लाखांचे नुकसान झालेले आहे. तर पाटण तालुक्‍यातील ६३३ दुकाने, लघुउद्योग, शॉप्सचे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कऱ्हाडमधील ९२ लघुउद्योग बाधित झाले असून, त्यांची नुकसानीची किंमत ८६ लाख आहे. घरांच्या नुकसानीमध्ये पूर्णपणे बाधित घरांची संख्या ५३ असून, त्यांचे ६६ लाखांचे नुकसान झाले आहे. तर सहा हजार अंशत: बाधित घरे असून, त्यांचे एक कोटी ४६ लाखांचे नुकसान झाले आहे. 

बांधकाम विभागाचे रस्ते, पूल आदींचे एकूण २९ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ग्रामीण रस्त्यांचे २० कोटी नऊ लाखांचे नुकसान आहे. तसेच १३४ पाणी योजना बाधित झाल्या असून, त्यांचे नुकसान तीन कोटी ९० लाखांच्या घरात जात आहे. पाटबंधारे विभागाकडील कालवे, बंधारे यांचे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाणी उचलून देण्यासाठीच्या विद्युत मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसानी १४ कोटींच्या घरात गेली आहे. 

जिल्हा परिषदेसह इतर शाळांच्या इमारतींना पुराचा फटका बसला आहे. अंशत: पडझड, भिंती पडणे, पूर्ण शाळा पडणे असे नुकसानीचे प्रकार असून, आतापर्यंत आठ कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मत्स्य व्यवसायाला फटका बसला. यामध्ये मत्स्य व्यवसायाचे एक कोटी ६६ लाखांचे नुकसान झाले आहे.

मुंबईत शेती नुकसानभरपाईसाठी बैठक  शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच असून, त्यामुळे या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. पण, सध्याच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी मुंबईत केंद्रीय समितीसोबत मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामध्ये नुकसानभरपाईची नेमकी पध्दत आणि आकडा स्पष्ट होणार आहे.  घरांचे नुकसान : पूर्ण बाधित घरे -  ५३, अंशत: बाधित घरे  : ६०००  जनावरे :  दुधाळ जनावरे : २९,छोटी जनावरे : २५, ओढकाम करणारी जनावरे : तीन  कोंबड्या : २१००.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com