शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’ अग्रेसर

लोकसहभागातून जल, मृद संधारणाची कामे
लोकसहभागातून जल, मृद संधारणाची कामे

धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही स्वयंसेवी संस्था गेल्या दोन दशकांपासून पर्यावरण संवर्धनातून शाश्वत ग्रामविकासासाठी प्रयत्नशील आहे. संस्था प्रामुख्याने लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास करून कृषी व पशुपालन वृद्धीसाठी विविध उपक्रम राबविते. याचबरोबरीने संस्थेने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणविकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. 

वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्र विकास करून कृषी व पशुपालन वृद्धीसाठी विविध उपक्रम राबविते. वन क्षेत्रांचा विकासाच्या बरोबरीने मुख्यत्वे संरक्षणावर (चराई नियंत्रण व कुऱ्हाडबंदी) भर देऊन नैसर्गिकरीत्या अधिवासांचे पुनरुज्जीवन करण्यावर संस्थेने भर दिला आहे. संपूर्ण देशभरात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. वसंतराव कृष्णाजी ठाकरे हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विजयसिंह जमादार हे सचिव आणि डॉ. धनंजय नेवाडकर हे खजिनदार आहेत. 

   पर्यावरण संवर्धन 

  • पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व व उपाययोजना यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल यात्रेद्वारे प्रत्यक्ष सहभागी करून संस्थेने वनांची सफर घडवून आणली. २००० ते २००७ यादरम्यान संस्थेने नऊ सायकल यात्रांचे आयोजन केले होते. या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत सजगता निर्माण झाली.
  • धुळे जिल्ह्यातील लळिंग व लामकानी कुरण परिसरात संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करून, त्यांचे सक्षमीकरण करून शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून राबवल्या. रोजगार हमी योजनेचा योग्य पद्धतीने वापर करून शासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून जल व मृद संधारणाची कामे झाली. मजुरांना कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने कामे वेळेत व चांगल्या प्रतीची झाली.
  •  रो.ह.यो.तून आतापर्यंत संस्थेने सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रात सलग समतल चर, खोल चर, ओघळ नियंत्रण, माती बांध अशी कामे उत्कृष्टरीत्या केली. या कामांच्या परिसरात मुख्यत्वे वन क्षेत्र होते त्याला वनसंरक्षणाची भक्कम जोड देण्यात आली, संयुक्त वन व्यवस्थापन, जैव विविधता कायदा यांचा वापर करून लोकसहभाग.
  •  चराई नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला. यासाठी लोकप्रबोधनाचे विविध मार्ग अवलंबण्यात आले. यामध्ये कीर्तनापासून, स्थानिक लोककला, तमाशाचाही वापर करण्यात आला. 
  •  विद्यार्थी सहभागासाठी ग्रीन आर्मी स्थापना, बी संकलन, बीजारोपण इत्यादी उपक्रम राबवण्यात येतात. 
  •  गावशिवाराच्या परिसरात कुरणाचा विकास होऊन दुष्काळातही मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत आहे. मृद व जलसंधारण कामांमुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. बागायत क्षेत्र व दुग्ध व्यवसायात वाढ झाली. 
  • जैवविविधता समितीची स्थापना 

  •   धुळे तालुक्यातील लामकानी, लळिंग, जुन्नेर, मोरशेवडी, सडगाव, सोनेवाडी, अनकवाडी, आर्वी या गावात, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने जैवविविधता समित्या स्थापन करण्यात आली. 
  •   ग्रामस्थांना जैवविविधता नोंदवही तयार करण्यास मदत करण्याचे काम व त्याद्वारे जैवविविधता कायद्याचा वापर करून परिसराच्या नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत व समन्यायी उपयोगासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • पर्यावरण शिक्षण उपक्रम 

  •   पुणे येथील सीईई संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आठ गावांतील चार माध्यमिक व १७ जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून पर्यावरण शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिवारफेरीचे आयोजन करून त्यांना प्रत्यक्ष निसर्गातील परिसंस्थांची ओळख, त्यातील विविध घटकांचे परस्पर सहजीवनाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. या अभ्यासासाठी दिशादर्शक, दुर्बीण, जीपीएस यंत्र, कॅमेरा यांचा वापर कसा करावा, नोंदी कशा ठेवाव्यात, इ.चे प्रात्यक्षिकासहित गौताळा अभयारण्यात विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येते.
  •  पर्यावरण विषयात गोडी असणरे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या तीनदिवसीय निवासी कार्यशाळांचे (आनंदशाळा) लामकानी, हिवरे बाजार व तोरणमाळ येथे आयोजन करण्यात येते. गवताळ माळरान या परिसंस्थेतील स्थानिक गवतांची ओळख, त्या गवतांचे टिकाऊ संग्रह माहितीसह बनविणे, माती परीक्षण, पाणी परीक्षण यांचे प्रात्यक्षिक दाखवून शाश्वत शेतीसाठी याचे महत्त्व सांगणे, रोपवाटिका तंत्र कार्यशाळेचे सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने आयोजन केले जाते.
  •  रद्दीपासून हातकागद बनविणे, बियाण्यांची उगवण क्षमता मोजणे, “माझ्या थाळीत काय काय” यातून आजी-आजोबा, आई-वडील व स्वतः विद्यार्थी यांच्या आहारात झालेला बदल नोंदविणे. त्याचा आरोग्यावर झालेला बदल समजून घेणे, गावाचे गवताळ माळरानसंवर्धन धोरण विद्यार्थी सहभागातून ठरविणे, गावाचा जैवसांस्कृतिक नकाशा बनविणे इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
  • पशुपालनाला चालना 

  • दुग्ध व्यवसाय शाश्वत करण्यासाठी जनावरांचे संगोपन, संतुलित आहार, पाणी व्यवस्थापन, आजारांची ओळख आणि उपाय योजना यासाठी प्रत्येक गावांत शिबिरांचे आयोजन.
  •     पशुसंवर्धन विभाग, धुळे यांच्या सहकार्याने पशू आरोग्य शिबिरांचे आयोजन. लसीकरण, आदर्श वासरू-पारडू संगोपन स्पर्धा आयोजन.
  •     गावातील चार तरुणांना बाएफ संस्थेच्या प्रक्षेत्रावर पशुसंवर्धन शिबिर, कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण. या तरुणांना लिक्विड नायट्रोजन संच उपलब्धता. 
  •     पौष्टिक चाऱ्याचे बियाणे, ठोंब (उदा. आफ्रिकन टॉल, नेपिअर, लसूण घास) बाएफ या संस्थेकडून सवलतीच्या दरात उपलब्ध. 
  •     मुरघास बनवण्यासाठी पशुपालकांना बाएफ संस्थेतील तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण. पशुपालकांना प्रोत्साहनासाठी अर्धा टन क्षमतेच्या मुरघास पिशव्यांचे वाटप.
  • स्थानिक गवतांच्या जातींचे संवर्धन 

  •   महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमांतर्गत मूळस्थानी गवताळ माळरान संवर्धन या महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या कार्यक्रमाचे आठ गावांत यशस्वी आयोजन करण्यात आले. यामुळे साधारण १००० हेक्टर क्षेत्रात विविध स्थानिक गवतांच्या जातींचे संवर्धन होत आहे. 
  •   गावशिवारात पवन्या, डोंगरी, मारवेल, फुलारे, काळी कुसळ, भाताड्या इत्यादी अनेक स्थानिक व पौष्टिक गवतांची वाढ होत असून, गवताळ माळरान ही परिसंस्था विकसित होत आहे. यातून या परिसंस्थेतील अनेक घटकांचा अधिवास संरक्षित झाला. यावर अवलंबून असणाऱ्या भूमिहीन समाजाच्या मूलभूत गरजांचे स्रोत सुरक्षित झाले आहेत. 
  • जैवविविधता पिटारा संच  संचामध्ये गावाच्या जैवविविधता अभ्यासासाठी उपयुक्त साधनसामग्री आहे, उदा. स्थानिक झाडा -झुडपांची,पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी, जलचर, कीटक, इत्यादींची छायाचित्रांसहित पुस्तके, घडीपुस्तिका, पर्जन्यमापक, माती व पाणी परीक्षण संच, कॅमेरे, दुर्बीण, होकायंत्र इत्यादी साहित्याचा समावेश आहे. ही सर्व साधने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिवारफेरीदरम्यान हाताळता येतात.  

    संस्थेला मिळालेले पुरस्कार 

  •   संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ठाकरे यांना केंद्र शासनाचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, राज्य शासनातर्फे कृषिभूषण, शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरव.  
  • संस्थेचे खजिनदार व महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमाचे प्रमुख संशोधक डॉ. धनंजय नेवाडकर यांना महाराष्ट्र सिंचन सहयोगाचा जलमित्र, निसर्गसेवक संस्थेचा निसर्ग सेवक, किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलचा वसुंधरा सन्मान, सकाळ माध्यम व पश्चिम घाट बचाव आंदोलनाचा कै. जगदीश गोडबोले स्मृती जीवन पुरस्कार, टेरी संस्थेचा ग्रीन हीरो आणि लुपिन फाउंडेशनचा रुरल अचिव्हर पुरस्कार.  
  • लामकानी गावातील उल्लेखनीय कामासाठी शासनाचा राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचा “संत तुकाराम वनग्राम पुरस्कार” आणि पाणी फाउंडेशनचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील प्रथम पुरस्कार. 
  • -  डॉ. धनंजय नेवाडकर, ९३७२८१०३९१ (लेखक वन्य सुस्थापन धारा (वसुधा) या संस्थेचे खजिनदार आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com