विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात आघाडीवर ः खोत

अॅग्रोवन पुरस्कार
अॅग्रोवन पुरस्कार

सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा तरुण शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार चांगला होत आहे. कृषी विद्यापीठे ही पांढरा हत्ती आहेत का? असा प्रश्‍न आहे. शेतीतील संशोधन शेतकरीच करतो, असे माझे ठाम मत आहे. ज्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. तितक्‍या प्रमाणात विद्यापीठे शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाहीत. त्यांच्या संशोधनाने क्रांती होताना दिसत नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी(ता.२३) येथे केले.  रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन (रोमिफ) आयोजित राज्यस्तरीय सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषदेचे उद् घाटन श्री. खोत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सेंद्रिय शेतीच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांना या वेळी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  श्री. खोत म्हणाले, की सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विक्रीची व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सरकारच्या वतीने अडीच हजार कोटी रुपयांचा पथदर्शी प्रकल्प आम्ही हाती घेत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून या शेतीला बळ देण्यासाठीच्या उपायाबाबत नक्कीच विचार करण्यात येइल. विक्री व्यवस्थेसाठी एकत्रित प्रयत्न झाल्यास सेंद्रिय शेतीला बळ मिळेल. येथून पुढील काळात विक्री व्यवस्थेची मजबूत साखळी निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. यासाठी सर्वांनी एकत्र यावे. संपूर्ण शेतमाल नियमनमुक्त करण्याबाबतही आम्ही प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आदिनाथ चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्याने शेती करताना व्यावसायिक व्हायला हवे. अद्यापही फारसे असे चित्र दिसत नाही. यामुळे शेती तोट्यात जाताना दिसते. शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबरच संवाद वाढवून शेतीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. अपुऱ्या माहितीवर चर्चा न करता विषयाच्या खोलात जाऊन शेतीची प्रत का बिघडली, यावर संशोधनात्मक कार्य झाले पाहिजे. पारंपरिक मानसिकता बदलायला हवी.  या वेळी शेती क्षेत्रात उल्लखेनीय कार्य करणाऱ्या नोका ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक संजय देशमुख, ॲग्रो सर्चचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावडे, बायफ (पुणे)चे जतीन साठे, वर्षा व सचिन येवले, ऋषीकेश ढाणे आदींना श्री. खोत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. संगीता खोत यांची भाषणे झाली. रोमिफचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नायकवडी यांनी रोमिफच्या उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष सौ. मनीषा पाटील यांनी स्वागत केले. जननी देशी बीज बॅंकेच्या सौ. राहीमावशी फोफरे, कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, उपसंचालक सुरेश मगदूम आदींसह रोमिफचे पदाधिकारी उपस्थित होते. कच्छी जैन भवन येथे सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषद आज (रविवार) अखेर चालणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com