सांगली : ‘‘दुष्काळ, कर्ज वसुलीतील अडथळे, महापूर, कर्जमाफीची योजना अशा परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आर्थिक वर्षात ९१ कोटी १८ लाख रूपये नफा मिळवला. आपत्तीमुळे कमी संधी असतानाही बॅंकेला चांगला नफा झाला,’’ अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, "बॅंकेच्या इतिहासात आर्थिक वर्ष अडचणीचे ठरले. सुरुवातीला दुष्काळामुळे कर्जवसुली थांबली. महापुरात वसुलीला स्थगिती मिळाली. कर्जमाफीच्या योजनेमुळे बॅंकेला यंत्रणा राबवावी लागली. आपत्तीमुळे बॅंकेला व्यवसाय करण्याची संधी फारच कमी मिळाली. आर्थिक वर्षात १० हजार कोटीहून अधिक रकमेचा व्यवसाय केला.’’ बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, सरव्यवस्थापक बी.एम. रामदुर्ग आदी यावेळी उपस्थित होते.
‘‘बॅंकेचे भाग भांडवल १४३ कोटी २२ लाख रुपये, निधी ४४० कोटी २५ लाख, ठेवी ५ हजार ८०० कोटी ८२ लाख इतक्या आहेत. बाहेरील कर्ज ६७८ कोटी ३३ लाख रुपये, तर गुंतवणूक २ हजार ३५८ कोटी २९ लाख रुपये आहे. ४ हजार २१४ कोटी कर्जवाटप केले. खेळते भांडवल ७ हजार ४४८ कोटी २८ लाख रुपये आहे, बॅंकेचा ढोबळ एनपीए ११.९१ टक्के असून निव्वळ एनपीए ८.११ टक्के आहे. सध्या ५०३ कोटी रुपये एनपीए आहे. ताब्यातील संस्था विक्रीचा निर्णय लवकरच
‘‘गत वर्षात साखर कारखान्यांना २४०० कोटी रुपये कर्ज दिले होते. यंदा कारखान्यांनी जादा कर्जाची मागणी केली नाही. कारखान्यांना १८०० कोटी कर्ज दिले. तसेच ठेवीवरील व्याजापोटी ५२ कोटी रुपये जादा द्यावे लागले. त्याचा परिणाम म्हणून बॅंकेला गतवर्षीपेक्षा नफा कमी झाला. तरीही बॅंक सुस्थितीत आहे. "सिक्युरिटायझेशन ऍक्ट' नुसार ताब्यात घेतलेल्या संस्था चालवण्याचा किंवा विक्री करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. आगामी वर्षात १२५ ते १५० कोटी नफ्याचे उद्दिष्ट राहील,'' असेही पाटील म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.