आटपाडी, जत आणि तासगावात पावसाची प्रतिक्षा

आटपाडी, जत आणि तासगावात पावसाची दडी
आटपाडी, जत आणि तासगावात पावसाची दडी

सांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत आणि तासगाव तालुक्‍यांत पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. मात्र, द्राक्ष, डाळिंब पिकांना पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात ऑगस्टपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या नाहीत. तर रस्त्यावर उतरून लढाई करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

ऑगस्टचा पहिला आठवडा संपत आला, तरी जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तासगाव, आटपाडी, खानापूर, जत, आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात द्राक्ष, डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस झाला नाही तर या भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस दुष्काळीपट्ट्यात पाण्याची भीषण टंचाई वाढू लागली आहे. वेळेत पाणी मिळाले नाही तर द्राक्ष, डाळिंब पिकांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसासिंचन योजना सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

दरम्यान, कृष्णा आणि वारणा नदीतून महिन्याभरात २०० टीएमसी पुराचे पाणी कर्नाटकात वाहून गेले. कर्नाटकात वाहून गेलेले पाणी तिन्ही योजना सुरू करुन तलाव भरले असते तर शेतीला पाणी मिळाले असते. मात्र, ऐन पावसाळ्यात या योजना सुरू करुन दुष्काळी पट्ट्यातील तलाव भरून देण्यासाठी प्रशासनाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांना धारेवर धरत आहे. पण पाणी देण्यासाठी पुढे का येत नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

टॅंकर सुरू करण्याची मागणी गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मुबलक पाणीसाठा झाला. यामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात केवळ सहाच टॅंकर सुरू होते. त्यामुळे शासनाच्या खर्चात बचतही झाली. मात्र, सध्या पावसाळ्यात जत तालुक्‍यात टॅंकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. मुळात जत तालुक्‍यातील पूर्व भागातील ४१ गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनचे पाणी मिळत नाही. त्यामुळे याभागात पाणी टंचाई आत्तापासून जाणवू लागली आहे. त्यामुळे जत तालुक्‍यातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

जत तालुक्‍यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना लवकरात लवकर सुरू करुन पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा.’ दाजी पाटील, कुंभारी, ता. जत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com