दुष्काळी उपाययोजना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करा : सरपंचांची मागणी

सरपंचांना गाव पातळीवरील परिस्थिती माहिती असते. त्यामुळे सरकारने दुष्काळ निवारणासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी द्यावा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच उपाययोजना कराव्यात, वस्तुस्थितीवर तातडीने उपाययोजना होतील आणि सरकारी यंत्रणावरीलही ताण कमी होईल. - अमृत धुमाळ, सरपंच, मुसळवाडी, ता. राहुरी, जि. नगर.
सरपंच महापरिषद
सरपंच महापरिषद

आळंदी, जि. पुणे  ः पाऊस नाही, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय, पोटासाठी, जनावरे जगविण्यासाठी लोक गावे सोडू लागलेत, अशा परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकार फक्त घोषणा करतेय, प्रत्यक्षात काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. गाव पातळीवरील परिस्थितीची सरपंचांना जाण असते, ग्रामपंचायतीला निधी देऊन शासनाने सरपंचांना दुष्काळी उपाययोजनांचे अधिकार द्यावेत, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. आळंदी येथे ‘अॅग्रोवन’तर्फे आयोजित सरपंच महापरिषदेत राज्यभरातून सरपंच सहभागी झाले आहेत. यात दुष्काळी भागातील सरपंचांचाही समावेश आहे. सध्या राज्यात गंभीर दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळाबाबतची सद्यःस्थिती, त्यामुळे होत असलेले स्थलांतर आणि सरकारी उपाययोजना याबाबत त्यांच्याशी संवाद साधला. माणूसमारवाडी, (ता. रेणापुर, जि. लातूर) येथील सरपंच व्यंकटराव जाधव म्हणाले, आमच्या भागासह मराठवाड्यात दुष्काळ गंभीर आहे. आतापर्यंत तातडीने उपाययोजना व्हायला हव्या होत्या, मात्र त्याबाबत सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसते.

बीड जिल्ह्यातील काठोडा (ता. गेवराई) येथील सरपंच जयराम घाटूळ म्हणाले, की खरिपात पिके आली नाहीत. रब्बीत पेरणी नाही, केवळ जनावरे जगवण्यासाठी गावगावांतून स्थलांतर होत आहे. अनेकांनी ऊसतोडणीचा मार्ग धरलाय, अशा परिस्थितीत सरकार फक्त घोषणा करत आहे. परिस्थिती हातातून गेल्यावर उपाययोजना करणार का, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,

पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी) येथील सरपंच धनश्री सिरसाठ म्हणाल्या, मराठवाड्याला जोडून असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ तीव्र आहे. आमच्या तालुक्यात चारा, पाण्याचा प्रश्न कठीण आहे. असे असताना अजूनही पुरेशा उपाययोजना केल्या जात नाहीत. लोकांनी केवळ जनावरे जगवण्यासाठी ऊसतोडणीचा मार्ग धरून स्थलांतर केले आहे.

पिंपरगव्हाण (ता. वडवणी) येथील तरुण सरपंच ईश्वर अंगद नाईकवाडे म्हणाले, की आतापर्यंत चारा छावण्या, चारा डेपो सुरू व्हायला हवे होते. जनावरे जगवण्याची चिंता असल्याने कमी दराने जनावरे विकावी लागत आहेत. याबाबत गांभीर्य कधी येणार?   

ताजपुरी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील सरपंच हेमंत सनेर म्हणाले, की यंदाचा दुष्काळ आतापर्यंतच्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. घोषणा नकोत तर कृती हवी आहे. ग्रामपंचायतीची मदत घेतली तर शासनाचेही काम सोपे होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com