सातारा : ‘‘जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नाही. कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वेक्षण केले जात आहे. पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागास माहिती द्यावी’’, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले.
‘‘परंपरागत अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडीचे मास व अंडी खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये. सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणताही असाधारण पक्षी मृत होण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ असे डॉ. परिहार म्हणाले.
डॉ. परिहार म्हणाले,‘‘‘बर्ड फ्लू’चा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्ष्यांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येऊ नये, तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, तालुका नोडल अधिकारी यांनाही देण्यात यावी. त्यामुळे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.’’
नोंदणी बंधनकारक
‘‘जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ७९ हजार ६११ इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. जैव सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून पक्ष्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. पाच हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे’’, असेही डॉ. परिहार यांनी स्पष्ट केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.