जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सुरू

जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सुरू
जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सुरू

परभणी ः पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी दुसरे पाणी आवर्तन गुरूवारी (ता. २४) सोडण्यात आले आहे. तब्बल महिनाभर सुरू राहणाऱ्या या पाणी आवर्तनाचा लाभ औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार आहे. दुष्काळी स्थितीत कालव्याच्या पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

यंदा पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे तसेच वरच्या बाजूच्या धरणातून जायकवाडीच्या हिश्श्‍याचा पूर्ण पाणीसाठा सोडण्यात न आल्यामुळे यंदा जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या (२०१७) च्या तुलनेमध्ये खूपच कमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. २०१८ मधील पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे डाव्या कालव्याद्वारे आधी खरिपात संरक्षित पाणी आवर्तन सोडण्यात आले. धरणामध्ये एकूण पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे केवळ रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले.

पहिल्या पाणी आवर्तनामुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीत ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांची पेरणी करता आली. परंतु, कालवा तसेच चाऱ्यांच्या दुरवस्थेमुळे पहिल्या आवर्तनाच्या पाण्याची नासाडी झाली. तसेच आवर्तनाचा कालावधी जास्त ठेवण्यात आल्यामुळे देखील पाणी वाया गेले. आवर्तन लवकर बंद केले असते तर धरणामध्ये जास्तीचा पाणीसाठा शिल्लक राहिला असता त्यावर उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडता आले असते. जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिकांसाठी पाणी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटनांनी केली होती.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानंतर गुरूवारी (ता. २४) जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ३०० क्युसेकने रब्बीसाठी दुसरे पाणी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे रविवारी (ता. २७) सकाळी ३८०.३८७ दलघमी (१७.५२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. एकूण २०८ किलोमीटर लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या पहिल्या १०० किलोमीटर पर्यंत हे पाणी पोचले होते. परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याची सुरवात १२२ किलोमीटर पासून होते. परभणी जिल्ह्याच्या हद्दीत पाणी पोचल्यानंतर कालव्याच्या प्रवाहाचा वेग ५०० क्युसेक्स करण्यात येणार आहे.

उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार २०१७ मध्ये जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात नियमित आवर्तने मिळाली होती. डाव्या कालव्याद्वारे तब्बल सहा ते सात महिने विसर्ग सुरू होता. परंतु यंदा (२०१८-१९) रब्बीतील दुसऱ्या पाणी आवर्तनानंतर धरणामध्ये जेमतेम ४ ते ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहील. त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांसाठी एप्रिल -मे महिन्यामध्ये एखादे सरंक्षित पाणी आवर्तन सोडता येऊ शकेल. परंतु, उन्हाळी हंगामासाठी गतवर्षीप्रमाणे नियमित पाणी आवर्तने मिळणार नाहीत. त्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com