कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात जमावबंदी आदेश लागू ः मुख्यमंत्री ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात जमावबंदी आदेश लागू ः मुख्यमंत्री ठाकरे
कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात जमावबंदी आदेश लागू ः मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हििडओ कॉन्फरन्सद्वारे याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऐतिहासिक आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि मध्यरात्री बारा वाजल्यापासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे; तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागांमध्ये १४४ कलम नाइलाजाने लावत आहे. जी जिद्द आज आपण दाखविली आहे, ती पुढेही दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागांंत १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ‘‘उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेने पार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे. आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेले आहे. उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू होणार आहे. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीजपुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण, जिथे वर्क फ्रॉम होम शक्य आहे तिथे घरूनच काम करा,’’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. रेल्वे, खासगी बस, एसटी बस बंद करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससेवा सुरू राहणार आहे. अन्नधान्य, भाजीपाला, औषध दुकाने सुरूच राहतील. बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नये आणि घरातल्या घरातसुद्धा वेगळे राहावे. चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. गरज पडल्यास ३१ मार्चच्या पुढेदेखील निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘सरकारी कर्मचारीसंख्या २५ वरून ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहेत. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘‘या संकटावर मात कशी करायची, या चिंतेने सर्व जग ग्रासले आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा ‘जनता कर्फ्यू’ आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की, नऊ वाजून गेले, आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाइलाज म्हणून संचारबंदी किंवा ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका,’’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजाअर्चा सुरू राहील. पण, भाविकांसाठी बंद राहणार आहेत. पण, माणुसकी जपा अणि तात्पुरत्या तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईची रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबईसाठी मोठा निर्णय घेतलाय. मध्यरात्रीपासून (२३ मार्च, रात्री १२.०० पासून) मुंबईतील लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठीदेखील मुंबईतील लोकल धावणार नाही.  कोरोनाचा राज्यात दुसरा बळी कोरोना व्हायरसमुळे राज्यात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावल्याची ही दुसरी घटना आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. पुण्यात चार, तर मुंबईत सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई महापालिकेकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार एचएन रिलायन्स रुग्णालयातील ५६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा पुरुष २१ मार्चला रुग्णालयात दाखल झाला होता. या व्यक्तीला डायबेटिस व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मध्यरात्री श्वसनाच्या त्रासाने ही व्यक्ती मृत्यू पावली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com