‘महाबीज’च्या बीजोत्पादन कार्यक्रमाला अतिवृष्टीचा फटका
परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांतील यंदाच्या खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रमाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परिणामी, एकूण बीजोत्पादनात ९० हजार ८७४ क्विंटलची घट येऊन सुमारे २ लाख १९ हजार ७५६ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. ही माहिती विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली. महाबीजच्या परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात विविध पिकांच्या प्रमाणित आणि पायाभूत बियाण्यांचा मिळून एकूण २९ हजार ७२१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित होता. परंतु प्रत्यक्षात १८ हजार ५६२.३० हेक्टर एवढे क्षेत्र बीजोत्पादन पिकांखाली आहे. त्यापासून ३ लाख १० हजार ६३० क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते. परंतु सततच्या पावसात भिजल्यामुळे बियाणे डागील झाले आहे. प्रत खालावली आहे. त्यामुळे बीजोत्पादनात ९० हजारांवर क्विंटलची घट येऊन २ लाख १९ हजार ७५६ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. त्यात १६ हजार ७०५ हेक्टरवरील सोयाबीनचे २ लाख ९० क्विंटल प्रमाणित बियाणे आणि १ हजार १८० हेक्टरवरील सोयाबीनपासून १४ हजार ९५९ क्विंटल पायाभूत बियाणे, उपलब्ध होऊ शकेल. ३२४.२० हेक्टरवरील तुरीपासून २ हजार ३०९ क्विंटल, ५३ ६० हेक्टरवरील मुगापासून २५९ क्विंटल आणि २६८.२० हेक्टरवरील उडदापासून १ हजार २४९ क्विंटल, ३०.४० हेक्टर ज्यूटपासून ९० क्विंटल बियाण्याचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
जिल्हानिहाय पीकनिहाय खरीप बिजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा | सोयाबीन | तूर | मूग | उडीद | ज्यूट |
परभणी | ५७३४ | १२८.४० | ५३.६० | ३९.६०. | २२.४० |
हिंगोली | ५५८६ | ०० | ०० | ५३ | ०० |
नांदेड | १२७६ | ०० | ०० | ५३ | ०० |
लातूर | ३७०७ | ११६. | ०० | ४४.४० | ४ |
उस्मानाबाद | १३५१ | ४२.८० | ०० | ३६.८० | ४ |
सोलापूर | १५० | ३६.६० | ००. | ४८.८० | ०० |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.