यवतमाळ जिल्ह्यात पेरणीनंतर मिळणार बियाणे

यवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगविल्याच्या तीन हजार दोनशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही कंपन्यांकडून बियाणे बदलून देण्याबाबत निर्णय झालेला नाही.
Seeds to be obtained after sowing in Yavatmal district
Seeds to be obtained after sowing in Yavatmal district

यवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगविल्याच्या तीन हजार दोनशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही कंपन्यांकडून बियाणे बदलून देण्याबाबत निर्णय झालेला नाही. पेरणीचा हंगाम निघून जात असल्याने आता उधारी करून शेतकरी लागवड करीत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना पेरणीनंतर बियाणे मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात एक जुलैपर्यंत नऊ लाख हेक्टरपैकी जवळपास सात लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली. आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी झालेली आहे. दोन लाख १९ हजार हेक्टरवर यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यातील जवळपास १० ते १२ टक्के क्षेत्र बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीच्या छायेत आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शासनाने संबंधित बियाणे कंपन्यांनी बियाणे बदलून देण्याचे आदेश दिलेले आहेत.

शासनाची कंपनी असलेल्या ‘महाबीज’ने शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यास सुरुवात केली. मात्र, खासगी कंपन्यांकडून अजूनही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्‍न मात्र कायम आहे. बियाणे न उगविल्याबाबत आत्तापर्यंत तीन हजार दोनशे शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. मात्र, अजूनही केवळ पंचनाम्याचे सोपस्कार सुरू आहेत. आत्तापर्यंत केवळ दीड हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले असून, अजूनही दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

पंचनम्यासाठी किती वेळ लागणार, हे अजूनही अस्पष्ट आहे. बियाण्यांबाबत अजूनही ठोस धोरण ठरलेले नाही. परिणामी, बियाणे कधी मिळणार, असा प्रश्‍न अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणीचे दिवस हातातून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी उधारी करून किंवा इतर पर्याय वापरून पुन्हा बियाणे खरेदीला सुरुवात केली. पावसाचे दिवस असल्याने पीक उगवले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. त्यासाठी नगदी स्वरूपात सोयाबीनचे बियाणे खरेदी केले जात आहे. अनेक तक्रारदार शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्याने पुन्हा बियाणे घेऊन त्याच काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरणी केली, अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

‘महाबीज’कडून बियाणे देण्यास सुरुवात ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, त्यांच्या तक्रारी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे आल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले जात आहे. आत्तापर्यंत जवळपास १२ हजार क्विंटल बियाणे बदलून देण्यात आले आहे, अशी माहिती महाबीज कंपनीकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com