जालना : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू शेती दिवसेंदिवस न परवडणारी होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतीपूरक उद्योगाकडे वळावे,’’ असा सल्ला राज्याचे माजी फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांनी दिला.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडळाचे २६८ वे मासिक चर्चासत्र झाले. नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानिमित्त पोकळे यांचा सत्कार करण्यात आला. कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांची उपस्थिती होती.
पोकळे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी अनुदानाचा विचार न करता रेशीम उद्योग, शेळीपालन, बीजोत्पादन, अन्नप्रक्रिया यांसारख्या उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. तरुणांचे शेतीमध्ये वाढलेले प्रमाण शेती व्यवसायातील जमेची बाजू आहे. आपल्या जवळपास ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत मराठवाड्यासाठी जमेल तेवढे प्रामाणिक प्रयत्न केले. शेततळ्याचे अस्तरीकरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण आदी योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम केले.’’
बोराडे म्हणाले, ‘‘पोकळे यांची कारकीर्द आपण जवळून पाहिली. त्यांनी तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाला पूरक अशा पद्धतीच्या बांबू, रेशीम, शेळीपालन पीक पद्धती स्वीकारण्याची गरज आहे.’’
कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. लाखन सिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, डॉ. तुकाराम मोटे, जिंतूरचे प्रयोगशील शेतकरी मधुकर घुगे, मृदा चाचणी अधिकारी अशोक भवरे, सुभाष धुमाळ, कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे प्रमुख एस. व्ही. सोनुने, कृषिभूषण भगवानराव काळे, कृषिभूषण उद्धवराव खेडेकर, कृषिभूषण गौतमराव देशमुख, कृषिभूषण मदनराव वाडेकर, उद्यान पंडित चंद्रकांत क्षीरसागर, शेतकरी पुंजाराम भुतेकर, नाथा पाटील घनघाव आदींची उपस्थिती होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.