सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून, त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २०) जिल्हा प्रशासनाला दिले.
सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी निर्देश दिले. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जीवितहानीही माहिती शक्य तितक्या लवकर संकलित करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा, हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषी, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीने करावेत.
हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलिस, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. येत्या काळात पडणाऱ्या पावसात कमीत कमी मनुष्यहानी होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. महसूल मंत्री श्री. थोरात, वडेट्टीवार यांनीही सूचना केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.