उस्मानाबादमध्ये रब्बीसाठी सात टक्के पीक कर्ज पुरवठा

खरीप हंगामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पीक कर्ज वाटप करून झाल्यानंतर आता रब्बीला पुन्हा कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रब्बीचा हंगाम सुरू होऊन आता ४५ दिवसांचा कालावधी लोटला आहे.
 उस्मानाबादमध्ये रब्बीसाठी सात टक्के पीक कर्ज पुरवठा Seven per cent crop loan supply for rabbis in Osmanabad
उस्मानाबादमध्ये रब्बीसाठी सात टक्के पीक कर्ज पुरवठा Seven per cent crop loan supply for rabbis in Osmanabad

उस्मानाबाद  :  खरीप हंगामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पीक कर्ज वाटप करून झाल्यानंतर आता रब्बीला पुन्हा कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रब्बीचा हंगाम सुरू होऊन आता ४५ दिवसांचा कालावधी लोटला आहे, तरीही आतापर्यंत फक्त सातच टक्के कर्ज वितरीत करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २ हजार २०० कोटीचे दोन्ही हंगामातील लक्ष्य आहे. खरीपामध्ये ५७ टक्के कर्ज वाटप झाले होते. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच एवढे कर्ज वाटप झाल्याने काहीप्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र, रब्बीत बँकांनी पूर्ण निराशा केली आहे. खरीप हंगामामध्ये दिलेल्या उद्दिष्टापैकी ५७ टक्के म्हणजे ९१४ कोटी कर्ज वाटप झाले होते. रब्बीचा विचार केला तर आतापर्यंत फक्त ५० कोटी रुपये वितरित झाले आहेत. साधारण ३१ डिसेंबरपर्यंतच कर्जवितरणाची ही मोहीम सुरू असते. पण आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर एका महिन्यात ही प्रक्रिया अधिक गतिमान करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज वाटप होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागणीनुसार सहज,सुलभ पीक कर्ज उपलब्ध व्हावे असे धोरण शासनाने राबविल्याने खरीप हंगामात निश्चित चांगले चित्र पाहायला मिळाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया आता अधिक जोमाने राबविणे गरजेचे होते. मध्यंतरी खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. अशावेळी त्याची भिस्त आता रब्बी हंगामातील पिकावर राहिलेली आहे, मात्र बँकाचा अल्पप्रतिसादाने शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला कर्जमाफीनंतर शासनाने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून शहरासह ग्रामीण भागातील बँकांमध्ये कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुसऱ्या बाजूला अपुरे अधिकारी, कर्मचारी अशी कारणे पुढे करून कर्ज वाटप प्रक्रिया ठप्प केल्याने पीक कर्ज वाटपात ही राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.बँकेत आधीच कर्मचारी कमी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यात पीक कर्ज वाटप करण्यास अधिकारी नाहीत साहजिकच सध्या पीक कर्ज देणे बंद आहे.अधिकारी येताच पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. कर्जाचा डोंगर असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून दिलासा दिला आहे. शेतकरी मुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेत विशेष लक्ष घातले, त्याचा परिणाम शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली तेव्हा पुढे पीक कर्ज मिळेल किंवा नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र खरीप हंगामामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना मागणीनुसार पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले व त्यातही जिल्ह्यामध्ये त्याचा चांगला परिणाम सुद्धा पाहायला मिळाला आहे. आता तशीच कामगिरी करण्याची मागणी रब्बी हंगामात सुद्धा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com