नगर जिल्ह्यात फळ उत्पादकांना सत्तर कोटींचा फटका 

नगर ः ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आठवडीबाजार व बाजार समित्या बंद आहेत. पुणे, मुंबईला वाहतूक करणारी वाहनेही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे मातीमोल दराने विक्री करावी लागत आहेत. तर ग्राहकांना मात्र दुपटीच्या दराने खरेदी करावी लागत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये विक्रीअभावी आणि दर मिळत नसल्याने नेहमीच्या तुलनेत साधारण ७० ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Seventy crores lost fruit growers in Nagar district
Seventy crores lost fruit growers in Nagar district

नगर ः ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आठवडीबाजार व बाजार समित्या बंद आहेत. पुणे, मुंबईला वाहतूक करणारी वाहनेही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे मातीमोल दराने विक्री करावी लागत आहेत. तर ग्राहकांना मात्र दुपटीच्या दराने खरेदी करावी लागत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये विक्रीअभावी आणि दर मिळत नसल्याने नेहमीच्या तुलनेत साधारण ७० ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

नगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ११ हजार हेक्टर क्षेत्रावर फळपिकांचे क्षेत्र आहे. मात्र, खरबूज, कलिंगडासह अन्य फळपिकांच्या क्षेत्राबाबत कृषी विभागाच्या आकडेवारीत ताळमेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड, खरबुजाचे यंदाचे क्षेत्र आहे. यातील बहुतांश शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन घेणारे आहेत. बाजारातील मागणीनुसार साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात फळे विक्रीला येतील, अशा अंदाजानेच लागवड केली जाते. यंदा मात्र नेमक्या विक्रीच्या काळातच आठवडीबाजार, बाजार समित्यामधील फळबाजार बंद झाले आहे. 

नगर जिल्ह्यात एकमेव नगर बाजार समितीत फळांची खरेदी-विक्री सुरू असली तरी खरेदी करणाऱ्यापेक्षा विक्री करणारे अधिक असल्याने बाजारात विक्री आणूनही मातीमोल दराने विक्री करत आहेत. ग्राहकांना मात्र खरेदीच्या तिप्पट दराने विक्री होत आहे. विक्री आणि दराअभावी आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे सत्तर ते ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका कलिंगड, खरबूज, द्राक्ष, पेरुला बसला आहे. मात्र, नेमका किती फटका बसला याबाबत कृषी विभागाकडे आकडेवारीच नाही. 

फळ उत्पादकांना फटका बसण्याची कारणे

  • फळे विक्रीच्या काळातच बाजार बंद राहिले. थेट विक्रीचा प्रयत्न केला तरी तीस टक्केही दर नसल्याने खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शहरात फळे विक्री करणे सोडून दिले. 
  • ग्रामीण भागातून वाहनधारकही शहरात येण्यासाठी धजावत नाहीत. ज्या शेतकऱ्य़ांकडे वाहने नाहीत. त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. 
  • कृषी विभागाने वाहतूक परवाने देत असल्याचे सांगितले असले तरी अनेकांना परवाने मिळाले नाही. पोलिस रस्त्यावर अडवतात. पेट्रोल पंपावर इंधन मिळण्यासाठी कसरत करावी लागते, याचाही परिणाम फळ विक्रीवर झाला. 
  • मी यावर्षी खरबुजाचे उत्पादन घेतले. ‘कोरोना’मुळे यंदा बाजार बंद असल्याने विविध ठिकाणी धडपड करत विक्री केली. यंदा बाजारात नेता न आल्याने दरवर्षीच्या तुलनेत केवळ चाळीस टक्के दर मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसला. - राजेंद्र आवारे, शेतकरी लाखेफळ ता. शेवगाव, जि. नगर   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com