खानापूर तालुक्यात तीव्र दुष्काळ

दुष्काळानं आम्ही हैराण झालोय. पाणी नसल्यानं शेती पडून राहू लागली आहे. पाणी देण्याची मागणी करूनदेखील मागणी पूर्ण केली नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. - दत्ता शिंदे, शेतकरी, सोरडी, (ता. जत.)
खानापूर तालुक्यात तीव्र दुष्काळ
खानापूर तालुक्यात तीव्र दुष्काळ

सांगली : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून केवळ टँकरच्या दीड खेपा दिल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांमधून प्रशासन व राज्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील बाणूरगड हे सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. अठरा विश्‍व दारिद्र्याचा सामना करावा लागत असलेल्या या गावातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून वरुणराजाही कोपला. सुमारे सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेल्या बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे परिसरांत जनावरांची संख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे.

भौगोलिकदृष्ट्या अत्यंत उंचावर असलेली ही तीन गावे सध्या तरी कोणत्याच जलसिंचन योजनेच्या आराखड्यात समाविष्ट नाहीत. त्यामुळे या परिसरात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्‍नही गंभीर आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती भकास आहे. शिवाय पिण्याचा पाणी प्रश्‍नही भेडसावत आहे. बाणूरगड येथे विहिरी, कूपनलिका कोरड्या आहेत. प्रशासनाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला. तरीही केवळ दीड खेप म्हणजे १५ हजार लिटर पाणी गावाला दिले जात आहे. 

टँकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे.  परिणामी, येथील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे परिसरातील भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पाणी व चारा न मिळाल्यास येथील लोकांवर जिवापाड जपलेली मूक जनावरे कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ येत आहे.

प्रशासन, नेत्यांकडून दुर्लक्ष

गेल्या चार वर्षांपासून बाणूरगड परिसरात पाऊस पडला नाही. परिणामी, चारा उत्पन्न झाले नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर आहे. शासनाकडे टँकरच्या खेपा वाढवून देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com