शेतकऱ्यांनी मांडल्या शरद पवार यांच्यासमोर व्यथा

शरद पवार यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
शरद पवार यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

सोलापूर: गावात पूर्वी दोन हजार लिटर दुधाचं संकलन होतं, आज ते दोनशेवर आलंय. छावण्यात जनावरे आणली, पण पाचच जनावरांना परवानगी हाय, शिवाय चाराही अगदी मोजून-मापून फकस्त १५ किलो मिळतो, यामध्ये जनावरं जगवायची कशी, यांसारख्या अनेक व्यथा यलमार मंगेवाडी (ता. सांगोला) येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. 

लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया संपण्यास २४ तास पूर्ण होण्याआधीच श्री. पवार यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. त्याची सुरवात मंगळवारी (ता.३०) त्यांनी माढा मतदारसंघातील सांगोल्यातील अजनाळे, यलमार मंगेवाडी या गावातून केली. मंगळवारी सकाळी त्यांचे सांगोल्यात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी यलमार मंगेवाडीतील छावणीला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार भारत भालके उपस्थित होते.  

या छावणीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तेव्हा एका शेतकऱ्याने त्यांच्याकडे तक्रार केली, की आमच्या फक्त पाच जनावरांनाच छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, तसेच रोज पंधरा किलो चारा मिळतो, त्याने भागत नाही.  जनावरांना अधिक चारा मिळावा. दुसऱ्या एका शेतकऱ्याने आमच्या गावात दोन हजार लिटर दूध संकलन होते. पण, आज ते दूध संकलन दोनशे लिटरवर आलं आहे, अशी माहिती दिली. त्यावर श्री. पवार यांनी खंत व्यक्त केली. पाण्याची परिस्थिती काय आहे, चारा किती आहे, असे काही प्रश्‍नही त्यांनी शेतकऱ्यांना विचारले. श्री. पवार थेट आपल्या गावात,  छावणीत येऊन विचारपूस करीत असल्याने उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

शेतकऱ्याच्या एका मुलाबरोबरही पवार यांनी संवाद साधला. त्याने शाळेच्या काही अडचणी सांगितल्या. त्याचे म्हणणेही त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. त्यावर पवार यांनी त्यालाही काही प्रश्‍न विचारले. तसेच गावातील किती पोरं बाहेरगावी शिक्षणाला आहेत, अशी विचारणा श्री. पवार यांनी शेतकऱ्यांकडे केली. दुष्काळामुळे शिक्षणात अडथळा येत असेल, तर मदत करण्याबाबत प्रयत्न करू, असेही आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले.  त्यानंतर अजनाळे येथे भेट दिली. त्यानंतर ते वाटंबरेकडे चारा छावणीस भेट देणार होते, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी पुढील दौरा रद्द केला आणि ते मुंबईकडे रवाना झाले.   ...तर सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर यावे लागेल राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. सांगोल्यात चारा-पाण्याअभावी जनावरांचे आणि माणसांचे हाल होत आहेत. सरकारने यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सरकारला तुमच्या बांधावर यावे लागेल, असे श्री. पवार यांनी अजनाळे येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी सरकारलाही आपल्या शब्दांत इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com