शेतकऱ्यांना घामाचा योग्य मोबदला द्या : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अस्वस्थ करणारा भाग असून, असा एकही दिवस जात नाही की एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही. आज शेतकऱ्यांना सन्मान मिळत नाही, त्यांच्या घामाचा मोबदलादेखील मिळत नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.   महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये गुरुवारी (ता.२९) आयोजित आढावा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव सोपान कासार, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, की दिवसेंदिवस शेतीवरील बोजा वाढत चाललेला दिसून येत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात शेतीसाठीची जमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. देश स्वतंत्र झाला त्या वेळी ३५ कोटी लोकसंख्येतील ८० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती आणि आजही १२० कोटी लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.  ‘‘मी कृषिमंत्री असताना देशभरामध्ये कृषी क्षेत्रासाठी असणाऱ्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करून घेतली होती. फळांच्या उत्पादनांच्या वाढीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले होते. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम आज दिसून येत आहेत. आपला देश धान्योत्पादन, दुग्धोत्पादन, फळे व भाजीपाल्यांच्या उत्पादनामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर    आलेला दिसून येत आहे. तरीही देशातील शेतीमध्ये मोठे बदल करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कपात कशी होईल याकडे शास्त्रज्ञांनी संशोधन करावे,’’ असे आवाहन श्री. पवार यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना केले.  या वेळी कृषी संशोधन व विस्तार कार्याची  माहिती डॉ. शरद गडाख व शिक्षण क्षेत्रातील विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल डॉ. अशोक फरांदे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  बापूसाहेब भाकरे यांनी केले व आभार डॉ. गडाख यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर, रावसाहेब म्हस्के, निर्मला मालपाणी उपस्थित होते.  विद्यापीठास देशामध्ये २४ वा क्रमांक शोभत नाही देश पातळीवर या विद्यापीठाचे मानांकन ३४ हून २४ व्या क्रमांकावर आल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडल्यानंतर श्री. पवार स्मितहास्य यांनी केले. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, की महात्मा फुले यांच्या नावाने काढलेल्या विद्यापीठास देशामध्ये सध्याचा २४ वा क्रमांक शोभत नाही. तो क्रमांक ३४ वर गेलाच कसा? आज विद्यापीठामध्ये सुमारे ४० टक्के जागा रिक्त आहेत. साधने दिलीच नाहीत, ही पदे भरली नाहीत, तर गुणवत्ता कशी वाढणार, हा मुद्दा सरकारदरबारी योग्य ठिकाणी मी मांडेन. 

पाहुणा म्हणून पाहुणचार करण्याऐवजी प्रश्‍न मांडा  आपल्या भाषणामध्ये विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सन्माननीय पाहुणे असा उल्लेख केल्याने आपली नाराजी श्री. पवार यांनी भाषणामध्ये मांडली. ते म्हणाले, की मी या विद्यापीठाचा दहा वर्षे प्रतिकुलपती राहिलो. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अध्यक्ष म्हणूनही १० वर्षे काम पाहिले आहे. मी आजही स्वत:ला या विद्यापीठाचाच एक घटक मानतो. पाहुणा म्हणून पाहुणचार करण्याऐवजी आपले सर्व प्रश्‍न मांडा, त्यांचे निराकरण करण्याचा नक्‍कीच प्रयत्न केला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com