सेंद्रीय प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी ः शरद पवार

‘मोर्फा’च्या वतीने पहिले विषमुक्त शेतमाल विक्री केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.
‘मोर्फा’च्या वतीने पहिले विषमुक्त शेतमाल विक्री केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.

पुणे:  सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी इतर राज्य आणि देशाचा विचार करावा. सेंद्रीय शेतमालाची विक्री करण्यासाठी मानांकन असावे. त्यासाठी कृषी विभागाकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र देणारी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्याशिवाय सेंद्रीय शेतमालाला चांगला दर मिळणार नाही, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.   महाआॅरगॅनिक अँड रेरिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने पहिले विषमुक्त शेतमाल विक्री केंद्राचे उद्‌घाटन सोमवारी (ता.३) मगरपट्टा येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे, मगरपट्टा सिटीचे चेअरमन सतीश मगर, ‘मोर्फा’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, प्रतिभा पवार, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, की देशातील बहुतांशी ग्राहकांकडून सेंद्रिय शेतमालाला मागणी आहे. त्यांना चांगला शेतमाल देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत. मोठ्या ग्राहकांशी करार करण्यासाठी ‘मोर्फा’चा जन्म झाला आहे. शेतकऱ्यांनी या कंपनीचे सभासद व्हावे. आखाती देशांतून चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक मागणी आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. विक्रीसाठी काही अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्यात येतील. परंतु, परदेशात विक्री करण्यासाठी सुरुवात तरी केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपण शेतमाल परदेशात विक्री करू शकणार आहोत.  सच्चिंद्रप्रताप सिंह म्हणाले, ‘‘मोर्फा’च्या माध्यमातून सेंद्रिय शेतमालाचे केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतमालाला चांगले दर मिळण्यास मदत होईल. राज्यात कृषी विभागाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत मागील दोन-तीन वर्षांत सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय गट स्थापन करण्यात आले आहेत. त्याला चालना देण्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात आले. विभागाने शेतमालाला सर्टिफिकेशन देण्यासाठी पीजीएसची सुविधा आणली आहे. त्याचा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.     अंकुश पडवळे म्हणाले, की सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी ‘मोर्फा’ची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. हे पहिले केंद्र असून, हेल्दी हार्वेस्ट हा ब्रँड तयार केला आहे.  कार्यक्रमात सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील, मोर्फाचे उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांनी प्रास्तविक केले. तर, विकी राठी यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com